AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जरांगेंच्या आंदोलनाआधीच सरकारला थेट इशारा, ‘मुंबईचा बी प्लॅन’ तयार; काय घडतंय?

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी निर्णायक उपोषण पुकारले आहे. सरकारने प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करावी, अशी त्यांची मागणी आहे. आरक्षणाची मागणी पूर्ण न झाल्यास 'मुंबईचा बी प्लॅन' तयार असून, 45 लाख वाहनांसह मुंबईकडे कूच करण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

जरांगेंच्या आंदोलनाआधीच सरकारला थेट इशारा, ‘मुंबईचा बी प्लॅन’ तयार; काय घडतंय?
Manoj Jarange PatilImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 29, 2026 | 10:12 AM
Share

अंतरवाली सराटी येथे आजपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उपोषणाला सुरुवात करणार आहेत. मात्र, त्याआधी मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी सरकारकडे प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. इतकंच नाही, तर मुंबईकडे कूच करण्यासाठी जरांगे पाटलांचा बी प्लॅन तयार असल्याचा दावा काळकुटे यांनी केला आहे. जरांगे पाटलांचं आंदोलन मुंबईकरांनी नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय. त्यामुळे आता पुन्हा मुंबईत जाण्याची वेळ आली, तर त्यासाठी पूर्ण तयारीनिशी अंतरवाली सराटीकडे निघालो आहोत, अशी माहितीही काळकुटे यांनी दिली आहे .

मनोज जरांगे पाटील आज शेवटचं आणि निर्णायक आंदोलन पुकारणार आहेत. अंतरवली सराटीत हे आंदोलन होत आहे. मात्र, जरांगे यांचा मुंबईला जाण्याचाही प्लान तयार आहे. मुंबईला जाण्यासाठी 45 लाख वाहने तयार असल्याचं सांगितलं जात आहे. आम्ही मुंबईला जाण्याची तयारी केली आहे. देवेंद्र फडणवीस जाणूनबुजून चालढकल करत आहेत आणि त्याला छुपा पाठिंबा एकनाथ शिंदे यांचा आहे. संजय शिरसाट यांच्या माध्यमातून ते करत आहेत. आम्ही जो पर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हलणार नाही. चर्चा करायला कधी ही या ना? काय अडचण आहे? आम्ही मात्र हलणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

अंत पाहू नका

अंतरवाली सराटी गावातल्या उपोषण स्थळावरच जरांगे उपोषण सुरू करणार आहेत. जरांगे पाटलांच्या शेवटच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा समाज बांधव अंतरवाली गावात दाखल झाले आहेत. सरकारने मराठा समाज बांधवांचा अंत पाहू नये, आम्ही सर्वजण मनोज रंगे पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचा विश्वास समाज बांधवांनी व्यक्त केला आहे.

पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

दरम्यान, वैजापूर तालुक्यातील खरज येथील पालकांचे व्हॅलिडीटीसाठी वैजापूरमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू आहे. चार विद्यार्थ्यांची कुणबी वैधता 8 महिन्यांपासून प्रलंबित आहे. खापर पणजोबा त्रिंबक निवृती यांची कुणबी नोंद असल्याचा दावा या आंदोलकांनी केला आहे. मात्र त्यांचे वडील निवृती कुशाबा मराठा असल्याने वैधता रोखल्याचा आरोप त्यांनी केला आहे. चार सुनावण्या, सर्व कागदपत्रे व गृह चौकशी पूर्ण झाली तरी निर्णय झालेला नाही. इंजीनियरिंगसाठी प्रवेश घेतल्यानंतर व्हॅलिडिटी मिळत नसल्याने शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती या आंदोलकांनी व्यक्त केली आहे. या आंदोलकांशी जरांगे पाटील यांनी फोनवरून संवाद साधल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

3 लाख अर्जांचं वाटप

दरम्यान, मराठवाड्यात 3 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे. मराठवाड्यात 3 लाख 13 हजार 897 कुणबी प्रमाणपत्रे वितरित करण्यात आले आहेत. कुणबी प्रमाणपत्रासाठी 3 लाख 14 हजार 498 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 524 अर्ज नाकारले आहेत. 77 अर्जांवर अद्याप निर्णय द्यायचा बाकी आहे. मात्र सरकारच्या या आकडेवारीवर मनोज जरांगे पाटील यांचा आक्षेप आहे. अनेक पात्र लाभार्थ्यांचे अर्ज प्रलंबित असल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे.

Follow Us