लोकांनी गरजेपेक्षा जास्त इंधन खरेदी केले, विक्रीत वाढ, भुजबळ म्हणाले घाबरु नका….
राज्यात इंधनाचा मुबलक साठा आहे. मात्र टंचाईच्या भीतीने घाबरुन लोक जास्त इंधनसाठा करत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

मुंबई : राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नसल्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. मात्र काही भागांत अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्याने पेट्रोल-डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये, असे आवाहन मंत्री भुजबळ यांनी केले आहे.
मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल-डिझेल वितरणाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, राज्य शिधावाटप नियंत्रक चंद्रकांत डांगे तसेच विविध तेल कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील जिल्हानिहाय विक्रीच्या आकडेवारीनुसार दैनंदिन विक्रीत मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. राज्यात पेट्रोल विक्रीत सुमारे २३ टक्के तर डिझेल विक्रीत तब्बल ५२ टक्के वाढ झाली आहे. अकोला येथे पेट्रोल विक्रीत ४४ टक्के, बुलढाणा येथे ४७ टक्के, जालना येथे ४९ टक्के तर वर्धा येथे ४३ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. डिझेल विक्रीतही अनेक जिल्ह्यांत ६० ते १०० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
यावेळी मंत्री भुजबळ यांनी तेल कंपन्यांना जिल्हा आणि तालुका स्तरावर नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. राज्यात पुरेसा इंधनसाठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती नागरिकांपर्यंत सातत्याने पोहोचवावी, असेही त्यांनी सांगितले.
काही ठिकाणी किरकोळ घटनांच्या आधारे इंधनटंचाईच्या अफवा पसरवल्या जात असून त्यामुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने आणि तेल कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या खरेदीवर लक्ष ठेवून अतिरिक्त साठेबाजी रोखावी, असे निर्देशही मंत्री भुजबळ यांनी दिले आहेत.
दरम्यान, बैठकीत एलपीजी आणि पीएनजी गॅसच्या उपलब्धता व वितरण व्यवस्थेचाही आढावा घेण्यात आला. नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
