महायुतीची जम्बो बैठक… अर्ध्यापेक्षा जास्त मंत्री हजर, महत्त्वाच्या चर्चेवेळीच बत्ती गुल; सगळीकडे अंधार
महायुती समन्वय समितीची जम्बो बैठक पार पडत आहे. आज पर्यंतच्या झालेल्या बैठकीपेक्षा ही बैठक अधिक महत्त्वाची आणि मोठी आहे. ही बैठक सुरू असताना मेघदूत बंगल्याची बत्ती गुल झाल्याची घटना समोर आली आहे.

महायुती समन्वय समितीची जम्बो बैठक पार पडत आहे. आज पर्यंतच्या झालेल्या बैठकीपेक्षा ही बैठक अधिक महत्त्वाची आणि मोठी आहे. मंत्री शंभूराजे देसाई यांच्या मेघदूत बंगल्यावर अर्ध्यापेक्षा जास्त मंत्रिमंडळ या बैठकीसाठी उपस्थित आहे. विधान परिषदेच्या 17 जागांवर यात चर्चा होत आहे. प्रत्येक मंत्र्यांकडून उमेदवारांची नावे सुचवली जात आहेत. ही बैठक सुरू असताना मेघदूत बंगल्याची बत्ती गुल झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे महत्त्वाच्या चर्चेवेळी सगळीकडे अंधार पसरला होता. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
जागावाटपावर चर्चा
मेघदूत बंगल्यावरील या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. यात निधीवाटप आणि विधान परिषद निवडणुकीचे जागावाटप हे प्रमुख मुद्दे आहेत. अनेक मंत्री उमेदवारीसाठी अनेकांची शिफारस करत असल्याचेही समोर आले आहे. मात्र अद्याप जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही. आज रात्री यावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
समन्वय समितीच्या बैठकीला खालील मंत्री उपस्थित
- मंत्री शंभूराजे देसाई
- मंत्री दादा भुसे
- मंत्री गुलाबराव पाटील
- मंत्री छगन भुजबळ
- मंत्री अदिती तटकरे
- मंत्री हसन मुश्रीफ
- मंत्री दत्तात्रय भरणे
- मंत्री इंद्रनील नाईक
- आमदार संजय खोडके
- मंत्री नरहरी झिरवाळ
- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
- मंत्री शिवेंद्रराजे भोसले
- मंत्री अशोक उईके
- मंत्री पंकजा मुंडे
- मंत्री गिरीश महाजन
- मंत्री नितेश राणे
- मंत्री पंकजा मुंडे
- मंत्री जयकुमार गोरे
- मंत्री चंद्रकांत पाटील
रवींद्र चव्हाण दिल्लीला जाणार
समोर आलेल्या माहितीनुसार, विधान परिषदेच्या उमेदवार निश्चितीसाठी भाजपात हालचालींना वेग आला आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आज बैठकीनंतर दिल्लीला रवाना होणार आहेत. दिल्ली दौऱ्यात चव्हाण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. विधान परिषदेचा फॉर्म्युला, भाजपच्या उमेदवारांची नावे व इतर बाबींची तपशीलवार माहिती ते पक्ष नेतृत्वाला देणार आहेत. त्यानंतर पुढील 2 ते 3 दिवसांत भाजप उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या 12 जागांसाठी एकूण 48 नावांची यादी घेऊन चव्हाण दिल्लीला जाणार असल्याचे समोर आले आहे.