मोठी बातमी! अखेर प्रतिक्षा संपली… मुंबईत पावसाचे आगमन, आता छत्र्या, रेनकोट तयार ठेवा; धो धो बरसणार
Monsoon Update: गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णतेची लाट पाहायला मिळाली. आज सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह काही उपनगरांमध्ये पाऊसाने हजेरी लावली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकरांची जीवघेण्या उकाड्यापासून सुटका झाली आहे. आज रविवारी सकाळपासून मुंबईत रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. सांताक्रूझ परिसरात प्रथम पावसाने हजेरी लावली. रविवार असल्याने रस्त्यांवर गर्दी कमी असल्याने पावसाचा आनंद मुंबईकरांना मुक्तपणे घेता आला. या पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नाशिक जिल्ह्यातही पावसाची हजेरी
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात आंबेवाडी, भावली, घोटी परिसरात सायंकाळी पावसाने जोर धरला. मात्र काही वेळ पडल्यानंतर पाऊस थांबला. निफाड तालुक्यातील पूर्व भागात देखील पावसाची हजेरी लागली. गोळेगाव, मरळगोई, गोंदेगाव परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने दिलासा दिला आहे. मात्र जून महिना प्रामुख्याने कोरडाच गेल्याने शेतकऱ्यांना मुबलक पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
वाशिम जिल्ह्यात पावसाने केली एंट्री
वाशिम व मालेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील मशागतीचे काम वेगाने होणार आहे. विशेषतः हळद लागवड केलेल्या शेतकऱ्यांना या पावसाने मोठा दिलासा दिला आहे.
विदर्भात मात्र कडक उष्णता कायम
दरम्यान, नैऋत्य मोसमी पावसाची प्रगती मंदावलेली असताना विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. भारतीय हवामान विभागाने २० ते २३ जून या कालावधीत अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ब्रह्मपुरी येथे ४३.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. वर्धा ४३°, नागपूर ४२.४°, अकोला ४२° सेल्सिअस. वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांवर उष्णतेचा प्रभाव.
२२ आणि २३ जूनला बुलढाणा जिल्ह्यालाही अलर्ट देण्यात आला आहे. काही भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळावे आणि पुरेसे पाणी प्यावे, असा सल्ला देण्यात आला आहे. २३ जूननंतर राज्याच्या आणखी काही भागांत मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या मुंबईसह नाशिक आणि विदर्भाच्या काही भागांत पावसाने सुरुवात केली असल्याने पुढील काही दिवस छत्री आणि रेनकोट तयार ठेवण्याचा सल्ला मुंबईकरांसह सर्व नागरिकांना देण्यात येत आहे.
