Central Railway : पुन्हा तेच .. सलग दुसऱ्या दिवशी लोकल 30 मिनिटं उशीरा, प्रवाशांचे हाल ! आता काय घडलं ?
काल डोंबिवली जवळ लोकल घसरल्याने मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली. आजही गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना प्रचंड गर्दी आणि मनस्तापाचा सामना करावा लागतोय. रेल्वेने चौकशी समिती नेमली असून, अपघाताचे कारण शोधले जात आहे. मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासावर मोठा परिणाम झाला आहे.

मध्य रेल्वेच्या डोंबिवली स्थानकाजवळ कळवा कारशेडकडून येणाऱ्या एका रिकाम्या लोकलचा डबा रूळांवरून घसरल्याने काल लोकलसेवा विस्काळीत झाली होती. त्यामुळे गाडया उशीराने धावत होत्या, परिणामी स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली, ज्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. अथक प्रयत्नांनी डबा रुळांवरून हटवण्यात आला आणि अनेक तासांनी रेल्वे सेवा सुरळीत झाली. मात्र दुसऱ्या दिवशीही मध्य रेल्वेची परिस्थिती फार उत्तम नसून आजही ट्रेन उशीराने धावत आहेत.
दिवा रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात रेल्वे पकडण्यासाठी तुफान गर्दी झाली आहे. डोंबिवलीजवळ सोमवारी लोकलचा डबा रुळावरून घसरल्यानंतर झालेला बिघाड आजही पूर्णपणे सावरलेला नाही. रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशीही मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे. लोकल २० ते ३० मिनिटं उशिराने धावत असून मंगळवारीही गर्दीचा सामना करावा लागत आहे. अप आणि डाऊन मार्गावरील, मध्य रेल्वेच्या लोकल्स या अर्धातास उशिरा धावत आहे. गाड्या उशीरा चालत असल्यामुळे गर्दीही वाढली आहे, तसेच ऑफीसला, कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना विलंब होत असल्याचे दिसून येत आहे. काल देखील रेल्वेचा फटका डोंबिवली आणि कोपर स्थानक जवळ बसला होता.
चाक घसरलं कसं ?
काल डोंबिवली स्टेशनजवळ झालेल्या लोकल अपघाताप्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. नुकताच 10 तासाचा मेगाब्लॉक घेतला, रुळांचे काम केले, पटरीवर नवीन स्लीपर देखील टाकले, त्यातही गाडीचा स्पीड 15 किमी असतानाही लोकलचे चाक घसरले कसे? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. याप्रकरणी मध्य रेल्वेकडून 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आली असून समितीचा अहवाल मागवत कारवाई करण्यात येणार आहे.
काल सकाळी डोंबिवली स्थानकाजवळ लोकलचे चाक रुळावरून घसरल्याने तब्बल 2 तास 45 मिनिटे लोकल सेवा ठप्प झाली होती. या अपघातामुळे अप-डाऊन मार्गावरील सेवा विस्कळीत झाली, तसेच 9 लोकल रद्द झाल्या आणि 12 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले होते. कोपर–कल्याण दरम्यान धीम्या मार्गावरील वाहतूक बंद असल्याने हजारो प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते . याप्रकरणाची आता चौकशी केली जाणार आहे.
बदलापूरला अवकाळी पावसाने झोडपलं
दरम्यान उन्हाच्या तडाख्याने मुंबईकर कातावले असले तरी आज सकाळच्या सुमारास बदलापुरात ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. गेल्या दोन दिवसांपासून बदलापूर आणि ग्रामीण भागात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे होता. त्यानंतर सकाळी ढग भरून आले आणि बदलापूर परिसरात पावसाने हजेरी लावली. या पावसाचा सर्वाधिक फटका नोकरदार वर्गाला बसलाय. सकाळी कामावर जाण्याच्या गडबडीत पावसाने हजेरी लावल्यामुळे कामावर निघालेल्या लोकांना भिजत भिजतच रेल्वे स्टेशन गाठावं लागलं.
