कलिंगड मृत्यूप्रकरणी हादरवून टाकणारं सत्य समोर; चौघांच्या शरीरात सापडला तो भयानक घटक; म्हणूनच…
कलिंगड खाल्ल्याने मुंबईतील एका संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी जीव गमावला होता. दरम्यान, आता या मृत्यूकांडाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Mumbai Watermelon Death : मुंबईतील पायधुनी येथे काही दिवासांपूर्वी कलिंगड खाल्ल्याने संपूर्ण कुटुंबाचा म्हणजेच चार जणांचा मृत्यू झाला होता. या कुटुंबाने अगोदर बिर्याणी खाल्ली होती, त्यानंतर कलिंगड खाल्ले होते. त्यामुळेच फक्त महाराष्ट्र नव्हे तर देशभरात या प्रकरणाची चर्चा झाली होती. कलिंगड आणि बिर्याणीबाबत वेगवेगळे दावे केले जात होती. काही लोकांनी तर कलिंगड न घाण्याचेच ठरवून टाकले होते. एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू कसा झाला? याचे कोडे सर्वांनाच पडले होते. दरम्यान, आता या प्रकरणी सर्वात मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. चक्क उंदराच्या औषधामुळे या कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती आता समोर आली आहे.
नेमकी काय माहिती समोर आली?
पायधुनी येथील कलिंगड आणि चार जणांच्या मृत्यूप्रकरणी आत्तापर्यंतची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. उंदीर मारण्याच्या औषधाने चौघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत्यू झालेल्या चौघांच्याही शरीरात उंदीर मारण्याच्या औषधात असलेल्या झिंक फॉस्फाईटचा अंश सापडला आहे. विशेष म्हणजे या चौघांनी जे कलिंगड खाल्ले होते त्याच्या नमुन्यातही झिंक फॉस्फाईचा अंश सापडला आहे.
रात्री खाल्ले होते कलिंगड, नंतर मृत्यू
या मृत्यूप्रकरणी गेल्या 11 दिवसांपासून तपास केला जात होता. आता अखेर मृत्यूचे नेमके कारण समोर आले आहे. डोकाडिया कुंबटातील चारही सदस्यांनी 26 एप्रिल रोजी कलिंगड खाल्ले होते. त्यानंतर अवघ्या काही तासांच्या अंतरात डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. चौघांनी रात्री कलिंगड खाल्ल होत. त्यामुळे कलिंगड खाल्ल्यानेच मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. अब्दुल्ला डोकाडिया (४४) त्यांची पत्नी नसरीन (३५) आयेशा (१६) आणि झैनब (१३) या चौघांचा यात मृत्यू झाला होता.
कलिंगड, बिर्याणीला घाबरून जाऊ नका
दरम्यान, डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूचे कारण समोर आल्यानंतर कलिंगड फळ तसेच बिर्याणी या खाद्यपदार्थाबाबत विनाकारण भीती बाळगू नये. हे पदार्थ खरेदी करताना स्वच्छता बाळगलेली आहे की नाही? याची खात्री करावी. तसेच निकृष्ट दर्जाचे कलिंगड खरेदी करू नये. कलिंगड हे शरीरासाठी उपयुक्त असणारे फळ आहे, असे सांगण्यात येत आहे.
