
Mumbai Rain Alert : संपूर्ण महाराष्ट्राला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा सर्वच भागांत पावसाने जोर धरला आहे. विशेष म्हणजे आगामी काही दिवसांत पाऊस कायम राहणार असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत तर स्थिती यापेक्षाही भयंकर आहे. मुंबईत जागोजागी रस्ते पाण्याने तुंबले आहेत. दरम्यान, याच मुंबईच्या पावसासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आगामी काही तास मुंबईत पावसाचा जोर वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस आज माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यभरात पावसाची स्थिती कशी आहे? याची माहिती दिली. तसेच मुसळधार पावसामुळे होणारे नुकसान आणि त्यासाठी राज्य सरकारची तयारी याबाबतही त्यांनी सविस्तर सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी मुंबईच्या पावसावरही भाष्य केले.
मुंबईचा विचार करायचा झाल्यास आज सकाळी सहा वाजेपूर्वीच्या 48 तासांत जवळपास 200 एमएम पाऊस पडला. आणि आज सकाळपासून सहा ते आठ तासांत तब्बल 170 एमएम पाऊस पडला आहे. म्हणजेच मुंबईत प्रचंड पाऊस पडला आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
चेंबूर भागात सर्वाधिक म्हणजेच 177 एमएम पाऊस पाडलेला आहे. यावेळी पावसाचा विशेष जोर हा शहरभाग आणि पूर्वी उपनगरात दिसतो आहे. एकूण 14 ठिकाणी पाणी तुंबलेले आहे. यापैकी 2 ठिकाणचे ट्रॅफिक थांबवण्यात आले आहे. बाकीच्या ठिकाणचे ट्रॅफिक चालू आहे. संपूर्ण मुंबईत ट्रॅफिक स्लो झालेले आहे, असेही यावेळी फडणवीस यांनी सांगितले.
आज मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला आहे. याबाबत बोलताना, कुठेही लोकल पूर्णपणे बंद झालेल्या नाहीत. काही गोष्टींमुळे लोकलचा वेग कमी झालेला आहे. लोकल लेट चालू आहेत. डॉप्लरने आलेल्या माहितीनुसार पुढच्या 10 ते 12 तास पावसाचा तीव्र जोर असण्याची शक्यता आहे. मुंबईला रेड अलर्ट मिळालेला आहे. हीच बाब लक्षात घेता दुपारच्या सत्रांत शाळांना आपण सुट्टी दिलेली आहे. मंत्रालयातही दुपारी चार वाजेनंतर लोकांना निघून जाण्याची परवानगी आपण देत आहोत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
आज संध्याकाळी सहा-साडेसहानंतर समुद्रात किमान तीन मीटरच्या लाटा असतील. उद्या चार मीटरपर्यंत लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या भरतीचा काळ आहे. या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस असेल. त्यामुळे समुद्राची आणि नाल्यांची पातळी सारखी असेल. आपल्याला मोठ्या प्रमाणात पाणी पंपिंग करावे लागेल. याची व्यवस्था मुंबई पालिकेने तयार केली आहे. लोकांनी काळजी घ्यावी. लाटा पाहण्याच्या मोहापाई लोक अडचणीत येतात, असे म्हण त्यांनी नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी असे आवाहन केले.
तसेच, आज संध्याकाळी डॉप्लर तसेच इतर माध्यमातून जे अलर्ट येतील त्याचा अभ्यास करून शाळांना सुट्टी द्यायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.