सगेसोयऱ्यांचे खोटे दाखले घेणाऱ्या आणि देणाऱ्यांविरोधात कारवाई होणार, बैठकीत मोठा निर्णय
राज्यात ओबीसी-मराठा असा संघर्ष पेटत चालल्याचं चित्र निर्माण झालं आहे. आजच्या सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीमध्ये सगेसोयऱ्यांचे खोटे दाखले देणारे आणि घेणारे यांच्याविरोधात कारवाई करण्याचं ठरल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची ओबीसी समाजाच्या मागण्यांची महाबैठक आज पार पडली. सह्याद्री अतिथी गृहामधील या बैठकीला ओबीसी समाजाचे नेते आणि मंत्रीमंडळील मोठे मंत्री यांच्यासह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होतं. या बैठकीमध्ये ओबीसी समाजाच्या कोणत्या मागण्या याबद्दल छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगेसोयऱ्यांचे खोटे दाखले घेणारे आणि देणाऱ्यांवर मोठी कारवाई होणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.
काही ठिकाणी खोट्या नोंदी करत तिथे खोटे दाखले देण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी याआधी एका पत्रकार परिषदेमध्ये केला होता. याचाच धागा पकडत पत्रकाराने त्यांना प्रश्न केला की याबाबत बैठकीमध्ये काही ठरलं का? यावर बोलताना खोटे प्रमाणपत्र देणारे आणि घेणारे हो दोन्ही गुन्हेगार असून त्यांच्यावर कारवाई होणार असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं सांगितलं.
काही मंत्री आम्ही उद्या पुणे आणि वडीगोद्रीला जाऊन समजावून सांगणार आणि त्यांना विनंती करणार. उपोषण मागे घ्यायला सांगणार. दोन चार दिवस आराम करायला सांगणार. त्यानंतर सर्वपक्षीय बैठकीत त्यांना भाग घेता येईल असं सांगणार. आम्ही सात आठ मंत्री जाणार आहोत. आम्ही जे आहे ते बोलू. त्यावर त्यांचा विश्वास बसेल. छगन भुजबळ बोलतोय. मी ओबीसींचा लीडर आहे. मी जेव्हा शिष्टमंडळ घेऊन जात आहे. तेव्हा माझी लोकं माझ्यावर विश्वास ठेवतील असं भुजबळ म्हणाले.
दरम्यान, ओबीसी नेत्यांचे जे प्रश्न आहेत.त्याचं उत्तर देऊ. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सकारात्मक आहे. त्यांनी काही गोष्टी मानल्या आहेत. अधिवेशनाच्या काळात सर्व पक्षीय बैठक घेऊन त्यात सर्व मुद्दे मांडणार असल्याचं सरकारने सांगितल्याचं भुजबळांनी म्हटलंय.
