कोणत्याही परिस्थितीत मुंबईतल्या या भागात कुर्बानीला परवानगी देऊ नका, भाजप नगरसेविका प्रिती साटम यांची आक्रमक भूमिका
Bjp Corporator Priti Satam : कुर्बानी विरोधात भाजप नगरसेविका प्रिती साटम यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना पत्र लिहून कुर्बानीला परवानगी देऊ नये अशी मागणी केली आहे. भाजपच्या सात आमदारांनी देखील मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलं आहे.

बकरी ईदला बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. त्यावरुन मुंबई आणि आसपासच्या परिसरात जोरदार राजकारण सुरु आहे. मीरा रोडमध्ये बकऱ्याच्या कुर्बानीवरुन हिंदू-मुस्लिमांमध्ये जोरदार वादावादी झाली. विषय हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचला. त्यानंतर आता गोरेगावच्या गोकुळधाम परिसरात बकऱ्याच्या कुर्बानीला विरोध करण्यात आला आहे. प्रभाग क्र 52 च्या नगरसेविका प्रिती साटम यांनी गोरेगाव (पूर्व) येथील गोकुळधाम परिसरातील सॅटेलाईट गार्डन फेज-२ मधील आझाद नगर डी-३ इमारतीच्या आवारात उघड्यावर बकरा कुर्बानी करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी सहाय्यक आयुक्त, पी (दक्षिण) विभाग यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
महापालिकेच्या विद्यमान धोरणानुसार सार्वजनिक ठिकाणी पशुवध करताना स्वच्छता, आरोग्य सुरक्षा, वाहतूक व्यवस्थापन तसेच शाळा, रुग्णालये आणि धार्मिक स्थळांच्या परिसरातील संवेदनशीलता लक्षात घेणे बंधनकारक आहे. संबंधित ठिकाणी उघड्यावर कुर्बानी झाल्यास दुर्गंधी, अस्वच्छता, रोगराईचा धोका तसेच स्थानिक नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
सामाजिक सलोख्यावर परिणाम होण्याची शक्यता
परिसरात शाळा आणि धार्मिक स्थळं असल्याने विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर तसेच परिसरातील सामाजिक सलोख्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील वर्षीही नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत संबंधित परवानगी रद्द केली होती.
स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घ्या
सार्वजनिक आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेता, यावर्षीदेखील संबंधित ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत कुर्बानीसाठी परवानगी देऊ नये, अशी मागणी प्रिती सातम यांनी प्रशासनाकडे केली आहे.
भाजपच्या सात आमदारांनी लिहिलं पत्र
मुंबईच्या महापौर, उपमहापौरांसह भाजपच्या सात आमदारांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी रहिवाशी संकुल, हाऊसिंग सोसायटी आणि चाळीत बकऱ्यांची कुर्बानी देण्यावर बंदी घालावी अशी मागणी केली आहे. पराग शाह, मनीषा चौधरी, अतुल भातखळकर, मिहिर कोटेचा, माजी खासदार किरीट सोमय्या आणि माजी खासदार मनोज कोटक यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून कुर्बानीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
