जरांगे तू कडू आहेस… बाथरूममध्ये जाऊन काय काय खाता? अजय महाराज बारस्करांचा हल्लाबोल
मराठा आरक्षण अभ्यासक अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जरांगे उपोषणादरम्यान बाथरूममध्ये जाऊन खातात, त्यांचा ढोंगीपणा उघडकीस आला आहे. ते मराठा समाजात अस्थिरता निर्माण करत असून, त्यांची भूमिका बेकायदेशीर आहे, अशी टीका बारस्कर यांनी केली आहे.

मनोज जरांगे तू कडू आहेस. तू आमची बरोबरी करू शकत नाही. जरांगेंच्या जीवाला उपोषणामुळे धोका नाही. जरांगे सलाईन, ग्लुकॉन डी घेतात. त्यांना ते दिले जाते. बाथरूममध्ये जाऊन ते काय काय खातात, हे सगळे माहिती आहे, अशा शब्दात मराठा आरक्षण प्रश्नाचे अभ्यासक आणि आंदोलक अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्ला चढवला. बारस्कर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जरांगे यांच्या आडमुठ्या आणि बेकायदेशीर भूमिकेची चिरफाडच केली.
गेल्या तीन वर्षापासून राज्यात मराठा आरक्षणाच्या नावाखाली भ्रष्टाचार आणि अस्थिरता सुरू आहे. त्यामुळेच मला बोलावं लागत आहे. मी 2006 पासून मराठा आरक्षणावर काम करत आहे. आम्ही मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल यावर काम करत आहोत. फडणवीस सरकारने मराठा समाजाला एसईबीसीचं आरक्षण दिलं. आमच्या सारख्या असंख्य लोकांच्या प्रयत्नातून आणि कष्टातून हे आरक्षण मिळालं आहे. मनोज जरांगे यानी काय केलं? त्यांचा यात साधा उल्लेखही नाहीये, असं अजय महाराज बारस्कर म्हणाले.
‘सगे सोयरें’चं काय झालं?
जरांगे यांनी तिन्ही ऋतूत आंदोलन करण्याचा ट्रेंड सेट केला आहे. जरांगे आता नेहमी हेच करणार आहे. वाशीच्या भाजीपाला मार्केटमध्ये जरांगेंनी सगेसोयरेंचा मुद्दा घेऊन आंदोलन केलं. त्या मुद्याचं नेमक काय झालं महाराष्ट्राला सांगू शकाल का? आता हैद्राबाद गॅझेटच्या मुद्द्यावरून आंदोलन करत आहे. त्यांना कोणते मुद्दे कसे मांडायचे हे तरी माहीत आहे का? असा सवालही अजय महाराज बारस्कर यांनी केला.
लाज तरी वाटते का?
तुमच्यासोबत कोण अभ्यासक आहेत? तुमची नेमकी मागणी आहे तरी काय? असा सवाल करतानाच मनोज जरांगे पाटील यांची सही असलेले एकतरी निवेदन दाखवा. फक्त चार जणांचे दाखले मिळवण्यासाठी हे असले आंदोलन करत आहेत. लाज तरी वाटते का? असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
समाजाला बदनाम करत आहेत
आतापर्यंत मराठा समाजातील 350 लोकांचा बळी गेला आहे. मराठा समाजाला आरक्षण असतानाही जरांगेंमुळेच लोकांच्या आत्महत्या होत आहेत. याला जरांगेच जबाबदार आहे. तुमच्या कपाळावर नरकाचा शिक्का लागणार आहे, असं सांगतानाच जरांगेंना मराठा समाजाचा नेता म्हणून दाखवलं जात आहे. पण त्यांची भाषा पाहिली का? काय भाषा आहे त्यांची? या माणसाने समाजाची वाट लावून टाकली आहे. जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांबद्दल अपशब्द वापरतात. विखे पाटलांना पेन ड्राईव्ह कुठे घालायचा म्हणतात, असं म्हणतांना लाज वाटते का? वाट्टेल ती भाषा वापरून समाजाला बदनाम करण्याचा हा डाव आहे. जरांगे समाजाला बदनाम करत आहेत, असा हल्लाच त्यांनी चढवला.
जरांगेंची भाषा सुपारीची
जरांगे यांची भाषा ही निव्वळ सुपारीची भाषा आहे. बारामती डेअरीच दूध जरंगेने आधी आणले होते. त्या दुधाच्या जोरावर जरांगेनी एवढ्या शिव्या दिल्या. आता ते दूध संपलेल आहे.फडणवीसांना आधी शिव्या देऊन झाल्या. आता फडणवीस साहेब, फडणवीस साहेब करत आहे. आता फक्त फडणवीस साहेबांचे पाय धुवायचे बाकी आहेत, असा टोला त्यांनी लगावला. अब्दुल सत्तार भेटायला आले म्हणून संजय शिरसाट यांना शिव्या घालण्याचं काम जरांगे करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
