संजय राऊत यांच्या त्या विधानावर अमृता फडणवीस यांचं एका वाक्यात उत्तर; थेट म्हणाल्या, माझी मानसिकता…
संजय राऊत यांच्या विधानावर अमृता फडणवीस यांनी 'आमची मानसिकता महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची आहे,' असे स्पष्ट करत पलटवार केला. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार असल्याच्या राऊतांच्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले. रचनात्मक टीकेला महत्त्व देतानाच, त्यांनी आश्रमशाळा, मॅटर्निटी लिव्ह आणि जुन्नर घटनेवरही विचार मांडले.

आमची मानसिकता राज्यातील जतनेची सेवा करण्याची आहे. देवेंद्र फडणवीस यांचीही तीच मानसिकता आहे. माझीही तीच मानसिकता आहे, अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार आहे. त्यांना मुंबईपेक्षा मोठा बंगला दिल्लीत मिळणार आहे. त्यामुळे वहिनी साहेबांनी हळूहळू मानसिकता तयार केली पाहिजे. त्यांच्या भावना मी समजू शकतो, असं विधान संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावर बोलताना अमृता फडणवीस यांनी हे विधान केलं आहे.
अमृता फडणवीस या मीडियाशी संवाद साधताना राऊत यांना एका वाक्यात उत्तर दिलं आहे. आमची मानसिकता, देवेंद्र फडणवीस यांची मानसिकता महाराष्ट्राची सेवा करण्याची आहे. आणि तीच राहणार आहे. आमची जी मानसिकता आहे, ती महाराष्ट्रासाठी योग्य आहे, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलंय.
सकाळी उठून भोंगा सुरू करणे…
विरोधकांवर होणाऱ्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. टीका करणं हे विरोधकांचं कामच असतं. मात्र, ती टीका कन्स्ट्रक्टिव्ह असायला पाहिजे. रोज सकाळी उठून भोंगा सुरू करणे हे योग्य नाही. काही मुद्दे असेल तर त्यावर टीका करणे हे निश्चितच लोकशाहीत आवश्यक आहे. मात्र नाहक टीका नये, असा टोला अमृता फडणवीस यांनी लगावला.
असं व्हायला नको होतं
राज्यातील आश्रम शाळांच्या परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केलं. आश्रम शाळांमध्ये जे घडलं आहे, त्याबद्दल मी पाहिलं आणि वाचलं आहे. अशा घटना व्हायला नको. मात्र सरकारने त्या संदर्भात कारवाईही केली आहे. अशा गोष्टींबद्दल निश्चितच लवकर कारवाई व्हायला हवी. सोबतच अशा गोष्टींना थांबवण्यासाठी ही काही प्रतिबंधात्मक कारवाई व्हायला हवी, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
मॅटर्निटी लिव्ह कितपत योग्य?
तामिळनाडू तिसऱ्या मुलासाठी मॅटरनिटी लिव्ह घोषणा करण्यात आली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. मुलांच्या संगोपणासाठी वेळ मिळावा हा महिलांचा अधिकार आहे. महिलांना सुट्टी मिळालीच पाहिजे. मात्र आपली लोकसंख्या आधीच एवढी वाढली आहे. त्यामुळे तिसऱ्या मुलासाठी अशी मॅटरनिटी लिव्ह देणं कितपत योग्य आहे? याचाही विचार होणं आवश्यक आहे, असंही त्या म्हणाल्या.
जुन्नर घटनेवर प्रतिक्रिया
जुन्नरमध्ये बालिकेवर झालेल्या अत्याचारावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. आपण (मुलींच्या संरक्षणासाठी) एक कायदाही केला आहे. त्यामुळे या घटना घडल्यानंतर कारवाई होतेच आहे. तरीही काही घटना घडत आहेत. समाज म्हणून आपण कुठे कमी पडत आहोत, तेही पाहणे गरजेचे आहे. जे कोणी आरोपी अशा घटना घडवतात, त्यांचे मूल्य आणि संस्कार कसे आहे हेही पाहणे गरजेचे आहे. जिथे स्त्रीचा सन्मान होतो तेच राष्ट्र पुढे जाते हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
राजदूताकडून कौतुक
अमेरिकेच्या राजदूतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचं कौतुक केलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मला आनंद आहे की अमेरिकेच्या राजदूतानी देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राची स्तुती केली. महाराष्ट्र आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्टीने भारताचं महत्त्वाचं राज्य आहे आणि मुंबई त्याची राजधानी असल्याने महत्त्वाची आहे. देवेंद्र फडणवीस दिवस-रात्र महाराष्ट्रासाठी काम करत आहेत. ते मोदींच्या नेतृत्वाखाली काम करत असल्याने असे चांगले काम करणे जास्त सोपं होतं. या चांगल्या कामांचा श्रेय मोदींजीना जाते, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.