
Bihar Election 2025 : दिल्लीच्या सत्तेच्या चाव्या या बिहार आणि उत्तर प्रदेशाकडे असल्याचा समज आहे. सध्या बिहार विधानसभा निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. वर्षाअखेर येथे नवीन सरकार कुणाचे असेल याचा कौल जनतेने दिलेला असेल. जागा वाटपाचा तिढा सोडवण्यात भाजपला यश आले आहे. पण नितीश बाबू सारखे महाराष्ट्राकडे का पाहत आहेत. त्यांना कसली धास्ती लागली आहे, असा चिमटा काँग्रेससह विरोध काढत आहे. काय यामागील तो गर्भीत इशारा?
कोणताही वाद नाही
एका टीव्ही शोमध्ये जेडीयूचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांनी NDA ची सरकार जर सत्तेत आली तर नितीश कुमार यांच्या नेतृत्वावरून भाजपसोबत कोणताही वाद होणार नाही असा दावा केला. 2020 मधील सत्ता स्थापनेच्या अनुभवावरून त्यांनी हा दावा केला. नितीश कुमार भाजपसोबत सरकार चालवण्यासाठी सक्षम असल्याचे आणि कोणताही अडथळा येणार नसल्याचा दावा झा यांनी केला आहे.
झा यांनी कोणता दिला दाखला
संजय झा यांनी बिहारमधील सत्ता स्थापनेचे गणित उलगडून दाखवले. 2020 मध्ये जेडीयूने 43 जागा तर भाजपने 73-74 जागा जिंकल्या होत्या. या निकालानंतर नितीश कुमार यांनी भाजपच्या नेतृत्वात मुख्यमंत्री निवडण्याचे स्वातंत्र्य दिले होते. पण भाजपने त्यांचा मुख्यमंत्री न बनवता नीतीश कुमार यांच्यावर विश्वास दाखवला. गेल्या पाच वर्षात सरकार सत्तेवर राहिले. त्यामुळे या निवडणुकीत जर भाजप-जेडीयू युती जिंकली तर नीतीश कुमार यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन करण्यात कोणतीही अडचण येणार नसल्याचा दावा त्यांनी केला.
पण विरोधकांनी साधला निशाणा
अर्थात विरोधकांना जेडीयूचा हा दावा मान्य नाही. त्यांच्या मते महाराष्ट्रात शिंदे सेनेसोबत भाजपने असाच डाव टाकला आणि शिंदे यांना नंतर उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागले. यावेळी जर निवडणुकीत ही युती जिंकली आणि भाजपच्या पारड्यात जास्त जागा आल्या तर भाजपचा मुख्यमंत्री होईल, जेडीयूचा नाही असा त्यांचा दावा आहे.
महाराष्ट्रात काय घडलं?
2024 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. महाराष्ट्रात NDA ला मोठं बहुमत मिळालं. त्यापूर्वी राज्यात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते. निवडणुकीत भाजपने 132 जागा जिंकल्या तर शिवसेनेला 57 जागांवर समाधान मानावं लागले. निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय भाजपने घेतला. तर एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले.