BMC Election Ward No 7: दहिसरमधील ठाकरेंचा बुरूज ढासळला, सौरभ घोसाळकर पराभूत; गणेश खणकर विजयी
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात उबाठा शिवसेना गटाला मोठा धक्का बसला आहे. दहिसरमधील पश्चिममधील वॉर्ड क्रमांक 7 हा उबाठा शिवसेना आणि भाजपासाठी प्रतिष्ठेची लढाई होती. पण अखेर या वॉर्डात भाजपाचं कमळ फुललं.

मुंबई महानगरपालिकेची गेल्या महिन्याभरापासून रणधुमाळी सुरू होती. सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांसाठी मोर्चबांधणी केली होती. दहिसर हा एकेकाळचा उबाठा शिवसेनेचा गड होता. त्यात भाजपा आमदार मनिषा चौधरी या प्रभागातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यामुळे हा गड कोण शाबूत राखणार याकडे लक्ष लागून होतं? त्यात प्रभाग क्रमांक 7 कडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागून होतं. कारण या प्रभागात खूपच वेगाने राजकीय घडामोडी घडल्या होत्या. पण भाजपाचे गणेश खणकर हे विजयी झाले आणि सौरभ घोसाळकर यांचा पराभव झाला. गणेश खणकर हे 779 मतांनी विजयी झाले. मतमोजणीवेळी एका मशिनचा तांत्रिक बिघाड झाल्याने दुबार मतमोजणी केली गेली. पण त्यातही गणेश खणकर यांचं नाणं वाजलं आणि विजयी घोषित केलं.
निवडणुकीपूर्वी काय घडलं?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी या प्रभागातून तेजस्वी घोसाळकर उबाठा शिवसेना गटातून उभ्या राहणार असा प्रचारही सुरू झाला होता. पण त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि वॉर्ड नंबर 2 मधून त्यांना तिकीट मिळालं. त्यानंतर विनोद घोसाळकर यांची दुसरी सून पूजा घोसाळकर यांनी वॉर्ड नंबर 7 मधून प्रचार सुरु केला. पण हा वॉर्ड खुला प्रवर्गातील असल्याने विनोद घोसाळकर यांचा मुलगा सौरभ घोसाळकर यांना उमेदवारी दिली गेली. पण त्यांना शिवसेनेचा हा गड राखता आला नाही. दरम्यान, तेजस्विनी घोसाळकर वॉर्ड नंबर 2 मधून भाजपाच्या तिकीटावर निवडून आल्या.
शिंदेसेनेकडून वॉर्ड भाजपच्या पारड्यात!
दुसरीकडे, या प्रभागातील मागच्या निवडणुकीत शिवसेनेकडून शीतल म्हात्रे विजयी झाल्या होत्या. त्यामुळे हा प्रभाग शिंदे गटाकडे असेल असं कार्यकर्ते गृहीत धरून होते. पण ही जागा भाजपाच्या वाटेला आली. भाजपाच्या वाटेला आल्यानंतर उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता होती. अखेर गणेश खणकर यांच्या नावाची घोषणा झाली. त्यानंतर भाजपा आणि उबाठा शिवसेना गटाची प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. या प्रभागात दोन्ही उमेदवार तोडीस तोड होते. त्यामुळे बाजी कोण मारणार याची उत्सुकता होती? मतमोजणीपर्यंत उमेदवार आणि कार्यकर्त्यांची धाकधूक होती. अखेर भाजपाने सरशी घेतली आणि गणेश खणकर विजयी झाले.
