मुंबई महापालिकेचा अजब कारभार… बांगलादेशी फेरीवाल्यांच्या नावाखाली महाराष्ट्रातीलच फेरीवाल्यांवर कारवाई; उपमहापौरांची थेट कबुली
BMC Action Against Hawkers : बांगलादेशी फेरीवाल्यांच्या नावाखाली महाराष्ट्रातीलच फेरीवाल्यांवर कारवाई झाल्याची माहिती उपमहापौर संजय घाडी यांनी दिली आहे.

गेल्या काही काळापासून मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झालेली आहे. यात काही बांगलादेशी फेरीवाल्यांचाही समावेश असल्याचा संशय आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतर पालिकेकडून फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र बांगलादेशी फेरीवाल्यांच्या नावाखाली महाराष्ट्रातीलच फेरीवाल्यांवर कारवाई झाल्याची माहिती उपमहापौर संजय घाडी यांनी दिली आहे. संजय घाडी यांनी नेमकं काय म्हटलं याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
फेरीवाल्यांना ओळखपत्र दिले जाणार
आज मुंबई महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत फेरीवाल्यांच्या प्रश्नांबाबत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत 10 जूनपर्यंत सर्व अधिकृत फेरीवाल्यांना ओळखपत्र आणि क्युआर कोड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकही अनधिकृत फेरीवाला मुंबईमध्ये राहिला नाही पाहिजे अशी महापालिकेची भूमिका आहे. त्यामुळे सर्व पात्र 1 लाख 29 हजार 4 फेरीवाले आहेत त्यांना ओळखपत्र दिले जाणार आहे अशी माहिती उपमहापौर संजय घाडी यांनी दिली आहे.
बांगलादेशी फेरीवाल्यांच्या नावाखाली राज्यातील फेरीवाल्यांवर कारवाई
महापालिकेने गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशी फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. मात्र आतापर्यंत जी कारवाई झाली त्यामध्ये कुठेही बांगलादेशी सापडलेला नाही. बांग्लादेशी फेरीवाल्यांच्या नावाखाली आपल्याच देशातील, महाराष्ट्रातील अधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई झाली आहे. एकही बांगलादेशी फेरीवाला सापडला नाही अशी कबुली उपमहापौर संजय घाडी यांनी दिली आहे. याचाच अर्थ बांगलादेशी फेरीवाल्यांच्या नावाखाली राज्यातील फेरीवाल्यांनाच फटका बसला आहे.
आमदारांच्या सांगण्यावरून फेरीवाल्यांवर कारवाई करू नये – निरूपम
शिवसेना नेते संजय निरूपम यांनी फेरीबाल्यांबाबत बोलताना म्हटले की, 12 वर्ष फेरीवाल्यांबाबत नियम लागू करण्यात झालेल्या दिरंगाईला पालिका जबाबदार आहे. केवळ पात्र फेरीवाले धंदा करू लागले की हप्त्याचा प्रश्न पण संपेल. 40 टक्क्यांपेक्षा जास्त मराठी भाषिक पात्र फेरीवाले मुंबईत आहेत. बोरीवरीलच्या आमदराने बांगलादेशी फेरीवाले म्हणून रान उठवलं होतं. संजय उपाध्याय यांच्या प्रति आदर ठेवून सांगतो की गोर गरीबांच्या विचार करून कारवाई करा बांगलादेशी बोलून त्यांच्यावर कारवाई करु नये. आमदाराच्या सांगण्यावरून कारवाई होता कामा नये. आजपर्यंत एकही बांगलादेशी फेरीवाला सापडला नाही. बांगलादेशी म्हणून फेरीवाल्यांवर चुकीची कारवाई करू नका.
