BMC Election: ठाकरे ब्रँडविरोधात हिंदुत्वाचा तडका! महापालिका निवडणुकीत हिंदुत्ववादी नेत्यांच्या प्रचारसभा, महायुतीचा खास फॉर्म्युला कामी येणार?

Mumbai Municipal Corporation Election: या आठवड्यात ठाकरे ब्रँडची चर्चा रंगली. मराठी, मराठी माणूस या मुद्दावर दोन्ही बंधु एकत्र आले. मराठी मनावर अजूनही ठाकरेंचा पगडा कायम आहे. हाच मुद्दा हेरून आता महायुतीने त्यावर उतारा म्हणून खास फॉर्म्युला आणला आहे. ठाकरे ब्रँडविरोधात हिंदुत्त्वाचा तडका लागणार आहे.

BMC Election: ठाकरे ब्रँडविरोधात हिंदुत्वाचा तडका! महापालिका निवडणुकीत हिंदुत्ववादी नेत्यांच्या प्रचारसभा, महायुतीचा खास फॉर्म्युला कामी येणार?
ठाकरे ब्रँडवर हिंदुत्वाचा उतारा
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Dec 27, 2025 | 12:07 PM

Campaign Rallies of Hindutva leaders: मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. राज ठाकरे यांनी या युतीची घोषणा केली. तर इतर महापालिकेतही ठाकरे ब्रँड एकत्र निवडणूक लढवणार आहे. ठाकरे ब्रँडची आठवडाभरापासून मुंबईत खास चर्चा आहे. मराठी, मराठी माणूस अजेंड्यावर ठेवत एकगठ्ठा मतांची बेगमी यामुळे आपसूकच मिळणार आहे. ठाकरे ब्रँडवर उतारा म्हणून आता महायुतीने खास रणनीती आखली आहे. सध्या देशात हिंदुत्वाचे वारे वाहत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीतही तोच मुद्दा इनकॅश करण्यासाठी महायुतीने आता हिंदुत्वाचे कार्ड बाहेर काढले आहे.

हिंदुत्वावादी नेत्यांच्या प्रचारसभा

महानगरपालिका निवडणूकीच्या रणधुमाळीत हिंदुत्ववादी नेत्यांची जोरदार क्रेझ आहे. मुंबईसह महामुंबईला लागून असणाऱ्या ईच्छूक उमेदवारांना हवी हिंदुत्ववादी नेत्यांच्याच प्रचारसभा हव्या आहेत.मतदारांचा हिंदुत्वाकडे वाढता कल पाहता भाजप महायुतीच्या उमेदवारांची हिंदूत्ववादी नेत्यांच्या सभा मिळवण्यासाठी पक्षनेतृत्वाकडे जोरदार फिल्डिंग लावली आहे. ठाकरे बंधूंच्या मराठी विरूद्ध अमराठी नरेटीव्हला हिंदुत्ववादी नरेटीव्हचा उतारा देण्याचा प्रयत्न महायुतीकडून होणार आहे.

मराठी मतांसह हिंदी भाषिकांची मोट बांधणार

हिंदुत्व ह्या मुद्दावर मराठी मतांसोबतच – हिंदी भाषिक आणि नवमतदारांमध्येही प्रचंड क्रेझ आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवनकल्याण तर राज्यातले हिंदुत्ववादी नेते आणि मंत्री नितेश राणे, गोपीचंद पडळकर यांच्या सभांची जोरदार मागणी होत आहे.उत्तर भारतीय नेत्यांकडून हिंदुत्ववादी नेत्यांच्या सभेसाठी मागणी वाढली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात अनेक दिग्गज हिंदुत्ववादी नेते हे मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात प्रचार करताना दिसतील.

बटेंगे तो कटेंगे चा प्रचार पॅटर्न

मुंबईसह वसई विरार, मिरा भाईंदर – भिवंडी, छत्रपती संभाजीनगर – नाशिक पुणे – पिंपरी चिंचवड – आहिल्यानगर – सोलापूर ह्या सर्वच महानगरपालिकेतील उमेदवारांना मंत्री नितेश राणे यांच्या प्रचारसभा हव्या आहेत. त्यासाठी उमेदवार आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा विधानसभेप्रमाणेच भाजप महायुतीचा ‘ बटेंगे तो कटेंगे ‘ प्रचार पॅटर्न असेल.मागच्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या भाषणात हिंदुत्वाशी कसलही कॅाम्प्रमाईज करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

उद्धव सेना दुसरीकडे अल्पसंख्यांक समाजाला सोबत घेण्याची तयारी करत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये रशीद मामू यांना सोबत घेण्यात आले आहे. तर मुंबईतही असाच प्रयोग यापूर्वी झाला आहे. नेमका हाच मुद्दा हेरून हिंदुत्वादी नेत्यांच्या प्रचाराचा रोख हा उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आणि मनसेविरोधात असेल. धार्मिक ध्रुवीकरणाचा फायदा नेमका कुणाला होईल, हे निकालानंतर समोर येईल.

बॅनरमधून ठाकरे बंधुंना डिवचले

उत्तर भारतीय सेनेने पुन्हा एकदा सेना भवनासमोर एक वादग्रस्त बॅनर लावला आहे.यावेळी बॅनरवर लिहिले आहे की, उत्तर भारतीय सटोगे तो बचोगे के वरना बाटोगे तो पिटोगे. मिळालेल्या माहितीनुसार, या बॅनरद्वारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना उत्तर देण्यात आले आहे.संदीप देशपांडे म्हणाले होते की मराठीचा अपमान कराल तो नहीं बटोगे तो भी पिटोगे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीदरम्यान अशा बॅनर्समुळे वाद होण्याची शक्यता आहे.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार

सुनील शुक्ला म्हणाले की जर उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री गोविंद पंत हे मराठी असू शकतात,तर मुंबईचे महापौर उत्तर भारतीय का असू शकत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये उत्तर भारतीयांना मारहाण होत आहे. सध्या मनसेचा उत्तर भारतीयांविरुद्ध नेट प्रॅक्टिस सुरू आहे,जर मनसे सत्तेत आली तर सीज़न क्रिकेट सुरू होईल. मनसे नेते संदीप देशपांडे म्हणतात की नहीं बटोगे तो भी पीटोगे. संदीप देशपांडे आम्ही सत्तेत येत आहोत,आम्हाला भीती वाटत नाही. उत्तर भारतीय विकास सेना महानगरपालिकेत १०० मराठ्यांना तिकिटे देत आहे. मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार असा दावा उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी केला.