महायुतीचा मास्टरस्ट्रोक; आघाडीतील बिघाडीचा फायदा घेणार, रात्री वर्षावर मोठी खलबत, काँग्रेसच्या बंडखोरीचा फायदा कुणाला?

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषद निवडणुकीत आघाडीतील बिघाडी महायुतीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बिघाडीचा फायदा घेण्यासाठी रात्री वर्षावर मोठी खलबतं झाली. काय आहे आघाडीचा महागेम?

महायुतीचा मास्टरस्ट्रोक; आघाडीतील बिघाडीचा फायदा घेणार, रात्री वर्षावर मोठी खलबत, काँग्रेसच्या बंडखोरीचा फायदा कुणाला?
महायुती, महाविकास आघाडी, विधान परिषद निवडणूक
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Apr 30, 2026 | 9:02 AM

Mahayuti Vs Mahavikas Aaghadi Congress: उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्याने काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस त्यांचा उमेदवार देणार असल्याची माहिती समोर येत आहे. आघाडीतील या बिघाडीचा फायदा महायुती घेऊ शकते. त्यासाठी वर्षा बंगल्यावर रात्री खलबतं झाली. विधान परिषद निवडणुकीसाठी 10 वा उमेदवार देण्याचे निश्चित झाले. त्यामुळे अतिरिक्त मतांच्या बिदागीवर महाविकास आघाडीचा एक उमेदवार पाडल्या जाईल. तर महायुतीचा अजून एक उमेदवार निवडून येईल. आता हा उमेदवार महायुतीतून कोणत्या पक्षाचा असेल हे मात्र गुलदस्त्यात आहे.

रात्री वर्षावर मोठी खलबतं

राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल रात्री उशीरा वर्षा बंगल्यावर भेट घेतली. विधान परिषद निवडणुकीत 10 वा उमेदवार उभा करण्याच्या संदर्भात काल रात्री वर्षा निवासस्थानी बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपने अगोदरच 6 उमेदवार जाहीर केले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे सेनेचा उमेदवार आज निश्चित होऊन अर्जही दाखल होतील. आज विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे.

काँग्रेसच्या भूमिकेवर महायुतीचे लक्ष

काँग्रेसने उमेदवार दिल्यास महायुतीही उमेदवार देणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. यासंदर्भात रात्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात अर्धा तास बैठक सुरू होती. विशेष म्हणजे या बैठकीपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार हे वर्षा निवासस्थानी दाखल झाले. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. अंबादास दानवे यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेस नाराज असल्याचे समजते. त्यामुळे काँग्रेस उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. वडेट्टीवार आणि फडणवीस यांच्यात काय खलबतं झाली हे मात्र समोर आलेले नाही.

जर -तरमध्ये फायदा कुणाचा?

महाविकास आघाडीत काँग्रेसचे 16 आमदार आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आमदार आहेत. तर सर्वाधिक 20 आमदार हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने अगोदरच उद्धव सेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे ठाकरेंचा उमेदवारांची विधान परिषदेतील एंट्री पक्की मानली जात आहे. 29 आमदारांच्या मतांवर विधान परिषदेचा आमदार ठरतो. काँग्रेसचे 16 आणि ठाकरे यांचे अतिरिक्त एक मत अशी 17 मतांची मोट महाविकास आघाडीकडे आहे. जर महायुतीचे 10 मतं खेचून आणली तर काँग्रेसचा उमेदवार निवडून येऊ शकतो. पण ही शक्यता कमी आहे. उलट महाविकास आघाडीच्या मतांना खिंडार पाडून 10 उमेदवार निवडून आणण्याची तयारी महायुतीने सुरू केल्याचे समोर येत आहे.

Follow Us