‘..तर लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागेल, सहकार्य करा’, मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना फोन

| Updated on: Apr 04, 2021 | 3:51 PM

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. त्याआधी मुख्यमंत्र्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फोन केल्याची माहिती मिळतेय.

..तर लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागेल, सहकार्य करा, मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना फोन
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना फोन
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतोय. अशावेळी राज्य सरकारकडून लॉकडाऊनचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी त्याबाबत संकेत दिले आहेत. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलून येत्या 48 तासांत निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. त्याआधी मुख्यमंत्र्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फोन केल्याची माहिती मिळतेय.(CM uddhav Thackeray calls MNS president Raj Thackeray)

“राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो,त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्री मा.श्री. उद्धव ठाकरे ह्यांनी राजसाहेबांना फोनवरील संवादात केलं”, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अकाऊंटवरुन सांगण्यात आलंय. राज्यात लॉकडाऊन लावण्याला भाजपसह मनसेनंही विरोध दर्शवला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केलाय. इतकंच नाही लॉकडाऊनचा निर्णय झाल्यास मनसेनं सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊनचा निर्णय होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु

राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. दूरदृश्यप्रणालीद्वारे ही बैठक होत आहे. या बैठकीत लॉकडाऊन की कठोर निर्बंध याबाबत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर राज्य सरकारकडून नवी कोरोना नियमावली जारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यात लॉकडाऊन लागू होणार की कठोर निर्बंध लागणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

मुंबईसाठी वेगळा निर्णय?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई आणि राज्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले जाऊ शकतात. मुंबईत मिनी लॉकडाऊन आणि राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याबरोबरच त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना लॉकडाऊन घेण्याचा अधिकार देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत होऊ शकतो. सत्ताधारी आघाडीतील मित्र पक्ष आणि विरोधी पक्षांचा लॉकडाऊनला असलेला विरोध पाहता राज्यात सरसकट लॉकडाऊन लावण्यात येणार नसल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

मुदत संपली, आता निर्णयाची वेळ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी दोन दिवसांची मुदत देत असल्याचं सांगितलं होतं. ही मुदत संपली आहे. त्यानंतर आज मंत्रिमंडळाची बैठक होत असून त्यात कठोर निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

लॉकडाऊन की कठोर निर्बंध?, मंत्रिमंडळाची आज तातडीची बैठक; संध्याकाळपर्यंत नवी गाईडलाईन जारी होणार?

Mumbai Corona: गर्दी अशीच राहिली तर मुंबईबाबत आजच्या आजच कठोर निर्णय; अस्लम शेख यांचं मोठं विधान

CM uddhav Thackeray calls MNS president Raj Thackeray