शिंदे भाकरी फिरवणार, विधान परिषदेनंतर कुणाला डच्चू? बच्चू कडूसह मंत्रिमंडळात नवीन चेहरा कोण?
Eknath Shinde Shivsena: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे. बच्चू कडू यांच्या रुपाने त्यांनी मास्टरस्ट्रोक मारला आहे. त्यापूर्वी ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर पाठवून काम न करणाऱ्या नेत्यांना थेट संदेश दिला आहे. आता मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार?

Cabinet Reshuffle: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीनंतर पक्ष संघटना बांधायला सुरुवात केली आहे. कार्यकर्त्यांची नाडी ओळखणारा धुरंधर शिंदेंना हवाय. टशन देणारा, प्रसंगी आक्रमकतेने पक्ष वाढवणारा, पक्षासाठी झटणारा कार्यकर्ता त्यांना हवाय. बंडाचा झेंडा घेऊन शिंदे बाहेर पडले. मध्यंतरी सर्वच लढले. मध्यंतरी पक्षाला जणू मरगळ आली आहे. महायुतीत भाजपने मुसंडी मारली. जिल्हा परिषद, पंचायत समितीत काही गवसलं, पण शिंदेंना मुंबई महापालिकेत सूर गवसला नाही. तेव्हापासून शिंदे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी संपर्क प्रमुख नियुक्तीतून मॅसेज दिला. तर बच्चू कडू यांना विधान परिषदे घेत मास्टरस्ट्रोक दिला. त्यापूर्वी ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर पाठवून त्यांनी नाकापेक्षा मोती जड झालेल्या नेत्यांना थेट संदेश दिला. विधान परिषद निवडणुकीनंतर जवळपास तीन वर्षे कोणतीही निवडणूक नाही. म्हणून शिंदे भाकरी जरूर फिरवणार असे भाकीत करण्यात येत आहे. बच्चू कडू यांना मंत्रिमंडळात घेण्यात येईल, मग डच्चू कोणाला मिळणार?
मुंबईसह विदर्भावर फोकस
एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीनंतर मोठा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत सत्तेत असूनही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपेक्षा शिंदे सेनेला सरस कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्यांनी लोकसभा दूर असतानाच संपर्कप्रमुख आणि विभागीय संपर्कप्रमुखांची नेमणूक केली. माजी आमदार आणि काही नेत्यांना मोठी जबाबदारी दिली आहे. तर मुंबई आणि ठाण्यात एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे तळ ठोकून आहे. त्यांच्या मदतीला खासदार नरेश म्हस्के असतील. त्यामुळे मुंबईतील कमी जागांचे गणित त्यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसते. ही कसर भरून काढण्यासाठी मुंबईसह महाप्राधिकरणावर वरचष्मा असावा यासाठी शिंदेंनी आतापासूनच पावलं टाकल्याचे दिसते.
तर मराठवाड्यातील सुंदोपसुंदी संपवण्याचे काम एकनाथ शिंदेंना हाती घ्यावं लागणार आहे. धाराशिवमध्ये पक्षातील बंडाळी हे मोठे आव्हान आहे. परभणीत नेत्यांना बळ देणे गरजेचे आहे. तर लातूर, नांदेडसह हिंगोलीतील नाराजी दूर करावी लागणार आहे. जालन्यासह छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे हे धक्कातंत्र वापरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये हाती असलेला डाव महापालिका निवडणुकीत टिकवात आले नसल्याचे समोर आले आहे.
विदर्भात दीपक सावंत आणि संजय राठोड यांच्यावर आता नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेस आणि भाजपचा झंझावात थांबवण्यासाठी शिंदे सेनेने हुकमी एका, बच्चू कडू यांना मैदानात आणले आहे. आक्रमक, लढवय्या आणि तळागाळाची अचूक नाडी ओळखणारा नेता म्हणून कडू ओळखल्या जातात. आता विदर्भात पक्ष भक्कम करायचा असेल तर कडूंना मोठा जबाबदारीच नाही तर मोठं पद द्यावं लागणार आहे. येत्या 6 महिन्यात कडूंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ असेल. मग डच्चू कुणाला मिळणार?
शिंदे भाकरी फिरवणार?
पक्षाच्या राजकीय भवितव्यासाठी आणि भाजपला रोखण्यासाठी सेनेतही तोडीसतोड चेहरे आवश्यक असल्याचे शिंदेंनी जवळपास निश्चित केल्याचे कडू यांच्या पक्ष प्रवेशावरून सिद्ध झाले आहे. निष्क्रिय पदाधिकारी जसे बाजूला करण्यात येणार आहे. तसेच खड्यागत मंत्रीही दूर करण्याचा हा एक मोठा संकेत आहेत. जे मंत्री त्यांच्या पदाची गरिमा राखण्यात आणि स्थानिक राजकारणात वजन राखण्यात कमी पडले ते शिंदेंच्या टार्गेटवर असतील. तर वाचाळवीरांनाही धडा शिकवावा लागणार आहे. नाहक वाद ओढावून पक्षाची प्रतिमा मलिन करणारे नेतेही बाजूला सारल्या जातील. तर या दोन वर्षात ज्यांची गुणपत्रिका कोरीच आहे, त्यांना झटका बसू शकतो. त्यामुळे येत्या काळात कॅबिनेटमध्ये आणि मंत्रिमंडळात भाकरी फिरवली जाऊ शकते. काहींचा खांदेपालट होऊ शकतो, अशी गोटातील माहिती सूत्रांनी दिली आहे. तर काहींना मोठं पदही मिळू शकतं. शिंदेंनी मोहरे हेरले आहेत, ते डाव कधी टाकतात याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.
