एकनाथ शिंदे खरोखरच काँग्रेसमध्ये जाणार होते? संजय राऊत यांच्या त्या दाव्याने खळबळ
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, असा दावा काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही या दाव्याला दुजोरा दिला असून, शिंदे यांनी दिल्लीत काँग्रेस नेत्यांच्या भेटी घेतल्याचे सांगितले. अहमद पटेल यांच्याशी चर्चा होऊनही काही काँग्रेस नेत्यांच्या विरोधामुळे शिंदेंचा प्रवेश होऊ शकला नाही, असे दलवाई म्हणाले. या गौप्यस्फोटामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये येणार होते, असा दावा काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केला आहे. दलवाई यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. दलवाई यांच्या या दाव्याला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही दुजोरा दिला आहे. एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते. त्यासाठी त्यांनी दिल्लीत काँग्रेस नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. त्यांना काहीही करून सत्तेत जायचं होतं, असा खळबळजनक गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या दाव्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आता त्यावर एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते, असा दावा केला होता. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मुंडे यांच्या प्रवेशाला विरोध केल्याचा दावाही चव्हाण यांनी केला होता. त्यानंतर काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांना याबाबत विचारण्यात आलं असता त्यांनीही मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, या दाव्याला दुजोरा दिला. मुंडेच नव्हे तर एकनाथ शिंदेही काँग्रेसमध्ये येणार होते. त्याबाबत त्यांच्या अहमद पटेलांसोबत चर्चाही झाल्या होत्या. पण काही काँग्रेस नेत्यांनी विरोध केल्याने शिंदेंचा प्रवेश होऊ शकला नाही, असं दलवाई म्हणाले. त्यावर आता संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया देताना शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते, असं म्हटलंय. ते मीडियाशी संवाद साधत होते.
शिंदेंचा रात्रीचा प्रवास, भेटीगाठी
एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसमध्ये जाण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने बरीच चाचपणी केली. काँग्रेस सत्तेवर होती तेव्हा शिंदे हे अहमद पटेल यांच्या माध्यमातून दिल्लीत बैठका घेत होते. हे आमच्याही कानावर आलं होतं. शिंदेंना काही करून सत्तेत जायचं होतं. पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसच्या आतल्या वर्तुळातील नेते असल्याने त्यांना या बाबतची अधिक माहिती होती. शिंदे तेव्हाही दिल्लीचा रात्रीचा प्रवास करत होते. कुणाच्या गाडीतून जात होते हे आम्हाला माहीत होतं, असं राऊत म्हणाले.
दीड महिन्यात निर्णय
आज कोर्टात शिवेसना पक्षावर सुनावणी आहे. त्यावरही राऊत यांनी भाष्य केलं. आज आमचा युक्तिवाद संपेल. कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत आमचा युक्तिवाद संपवतील. त्यानंतर फुटीरगट वेळ घेतील. त्यांच्यासाठी चार ते पाच दिवस कोर्ट वेळ देईल. त्यानंतर निर्णयासाठी क्लोज फॉर ऑर्डर राहील. दीड महिन्याच्या वेळेत शिवसेनेवर निर्णय येईल. हा खटला महत्त्वाचा आहे. माइलस्टोल जजमेंट येणार आहे, त्यामुळे थोडा वेळ लागेल, असंही त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांनी धनादेश न्यावेत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. त्यावरही राऊत यांनी भाष्य केलं. त्यांनी साधारण सरकारी तिजोरीतून 25 ते 30 कोटींचे धनादेश घेऊन जावे. खड्ड्यात जे 12 लोक मृत्यू पावले. त्यांना प्रत्येकी 1 कोटी द्यावे. जखमींना 50 लाखाची भरपाई द्यावी. आमची मोर्चात ही मागणी होती. देवेंद्रजींना नाशिकमध्ये जायची सुबुद्धी झाली, त्याबद्दल आभार आहे. त्यांनी नाशिकला मखमलाबाद, त्र्यंबक रोडला जावं. ताफा नेऊ नका. दोनच गाड्या घेऊन जा. आपण महाराष्ट्र काय करून ठेवला ते पाहावं. तुम्ही दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये 12 लोकांचा खड्ड्याने मृत्यू झाला. यावर आम्ही 302चा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मागतो. आयुक्तांवर गुन्हा दाखल व्हावा, अशी आमची मागणी आहे, असंही त्यांनी सांगितलं.