रितू तावडेंच्या ‘चमत्कार’ विधानावर किशोरी पेडणेकर यांचा हल्लाबोल, म्हणाल्या, प्रत्येक भाषणानंतर…
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी एका कार्यक्रमात बोलताना गुरूदेवजींच्या आशीर्वादाचा चमत्कार झाला. त्यांच्या आशीर्वादने माझ्या घशाचा त्रास कमी झाला, असे विधान केले. एकीकडे भोंदूबाबा अशोक खरातने चमत्कार, तंत्रमंत्राच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला.

Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी एका कार्यक्रमात बोलताना गुरूदेवजींच्या आशीर्वादाचा चमत्कार झाला. त्यांच्या आशीर्वादने माझ्या घशाचा त्रास कमी झाला, असे विधान केले. एकीकडे भोंदूबाबा अशोक खरातने चमत्कार, तंत्रमंत्राच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला. या घटनेमुळे अंधश्रद्धेचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी असतानाच रितू तावडे यांनी वरील विधान केले. त्यानंतर तावडे यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी गुरुदेवजींनी मला ओम मंत्रोच्चार म्हणायला सांगितले होते, असे म्हणत तावडे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तावडे यांनी केलेल्या विधानानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळेही वेगळा वाद निर्माण झाला. या सर्व घडामोडी घडत असतानाच आता शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्या तथा मुंबई महापालिकेच्या विरोधा पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी तावडे यांच्यावर सडकून टीका केली आहे.
किशोरी पेडणेकर नेमकं काय म्हणाल्या?
महापौर रितू तावडे यांना प्रत्येक भाषणानंतर सारवासारव करावी लागत आहे. असं नेहमीच का होतंय. सध्या अशोक खरातमुळे वातावरण गरम असताना रितू तावडे मुनींसमोरच तुमच्यामुळे माझा घसा बरा झाला, असे म्हणाल्या. ॐ च्या उच्चारात उद्गीथ प्राणायाम आहे. आपण एकदा प्राणायाम सुरू केला की ठिक व्हायला दोन वर्षे लागत नाहीत. आपल्या स्वरनलिकेवर दाब येऊन घर्षण होऊन आजार बरा होतो. मी त्या गुरुजींचा आदर करते पण आपण एकदा काही बोलतो त्याला सारवा सारव करावी लागू नये, असे किशोरी पेडणेकर रितू तावडे यांना उद्देशून म्हणाल्या.
रितू तावडे नेमकं काय म्हणाल्या होत्या?
रितू तावडे मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होत्या. या कार्यक्रमात मंत्री मंगल प्रभात लोढा हेदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना गुरुदेवजींच्या आशीर्वादाने माझ्या घशातील त्रास नाहीसा झाला. दीड दोन वर्षांपासून मी या समस्येने त्रस्त होते. माझ्यावर औषधोपचारही चालू होता. परंतु फरक पडत नव्हता, अशा आशयाचे विधान रितू तावडे यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.
