Raj Thackeray Election Commission Meet : तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, राज ठाकरेंची निवडणूक आयोगाकडे थेट मागणी
राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाची भेट घेऊन मतदार यादीतील मोठ्या घोळावर तीव्र आक्षेप घेतला. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी मतदार याद्यांमधील त्रुटी, नावांची पुनरावृत्ती आणि बनावट नोंदणी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांनी आज १४ ऑक्टोबर रोजी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेतली. यावेळी विरोधी पक्षांकडून मतदार याद्यांमधील प्रचंड घोळ, नावांची पुनरावृत्ती आणि खोट्या मतदार नोंदणीच्या मुद्द्यांवर तीव्र आक्षेप नोंदवला. या सर्वपक्षीय शिष्टमंडळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांसारखे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदार यादीतील गंभीर त्रुटींवर बोट ठेवत निवडणूक आयोगाला जाब विचारला.
मतदार याद्यांमध्ये प्रचंड मोठा घोळ आहे. वडिलांचे वय मुलाच्या वयापेक्षा कमी कसे असू शकते? हे सर्व हास्यास्पद आणि गंभीर आहे. एकाच मतदाराचे नाव दोन-दोन ठिकाणी कसे आहे? असा गंभीर सवाल राज ठाकरे यांनी यावेळी केला. तसेच मतदार याद्या दुरुस्त होईपर्यंत निवडणूक घेऊ नका अशी थेट मागणी राज ठाकरे यांनी केली. १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांना मतदानाचा हक्क का मिळत नाही आणि निवडणूक जाहीर नसतानाही अचानक मतदार नोंदणी का थांबवली, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.
तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का?
येत्या ३१ जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदेश आहेत. आपण आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का? अशी विचारणा राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला केली. मतदार यादीत इतका घोळ असताना निवडणूक कशी घेणार, असा प्रश्नही राज ठाकरेंनी यावेळी केला.
या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवावे, अशी मागणीही राज ठाकरेंनी यावेळी केली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनीही मतदार प्रक्रियेवर शंका व्यक्त केली. “मतदान कुणाला जातं हे कळत नाही,” असे मत त्यांनी व्यक्त केले. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी देशात आता कुठेच निवडणुका नाहीत, तर VVPat (व्हिव्हिपॅट) मशीन आणा. व्हिव्हिपॅट मशीन लावा” असे म्हटले.
उद्या पुन्हा बैठक होणार
राज्य निवडणूक आयोग आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांची आजची बैठक साधारण सव्वा तास सुरु होती. यावेळी सर्वच नेत्यांनी गंभीर मुद्दे उपस्थित केले. या मुद्द्यानंतर आता उद्या पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील प्रमुख विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र निवडणूक आयोग आयुक्त आणि राज्य निवडणूक आयोगातील अधिकारी उपस्थित असतील. या बैठकीची वेळ आणि इतर गोष्टी लवकरच ठरवल्या जातील. या बैठकीत मतदार यादीतील घोळ आणि निवडणूक आयोगाच्या तयारीवर सविस्तर चर्चा अपेक्षित आहे.
