मुंबईचा सर्वात जुना एल्फिन्स्टन पूल हटवला, मात्र रेल्वेचा खोळंबा, लोकल दादरपर्यंतच सुरु
मुंबईतील ११३ वर्षांचा ऐतिहासिक एल्फिन्स्टन पूल पाडल्याने रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. दादर ते सीएसएमटी दरम्यान रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

मुंबईतील रेल्वे इतिहासाचा साक्षीदार असलेला ११३ वर्षे जुना प्रभादेवी स्थानकाजवळील एल्फिन्स्टन पूल अखेर कायमचा इतिहासजमा झाला आहे. ४ एप्रिलच्या मध्यरात्री मध्य रेल्वेने घेतलेल्या विशेष मेगाब्लॉक दरम्यान या पुलाचे अवजड लोखंडी गर्डर हटवण्यात आले. हे काम तांत्रिकदृष्ट्या यशस्वी झाले असले तरी आज रविवारी सकाळी मुंबईकरांना प्रवासासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जाव लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री १०.३० वाजल्यापासून मध्य रेल्वेने दादर ते सीएसएमटी दरम्यान विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला होता. या पुलाचे ११३ वर्ष जुने आणि गंजलेले गर्डर काढण्याचे मोठे आव्हान रेल्वे प्रशासनासमोर होते. यासाठी गॅस कटिंगचा वापर करण्यात आला. गर्डरचा आकार मोठा असल्याने ते गॅस कटिंगच्या साह्याने मध्यभागातून कापण्यात आले. त्यानंतर कापलेले हे महाकाय गर्डर पहाटे ४ आणि ६ च्या सुमारास भल्यामोठ्या क्रेनच्या साहाय्याने उचलून रेल्वे रुळांपासून बाजूला करण्यात आले. हे कठीण काम विहित वेळेत पूर्ण होताच उपस्थित रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून जल्लोष करत आनंद साजरा केला.
प्रवाशांचा खोळंबा आणि गोंधळाचे वातावरण
रेल्वेकडून काम वेळेत पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात प्रवाशांचा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळत आहे. हा पूल हटवल्यानंतर ओव्हरहेड वायर (OHE)ची पुर्नजोडणी करण्यात आली. या ओव्हरहेड वायरच्या पुन्हा जोडण्याच्या कामाला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. यामुळे सकाळी ६ नंतरही रेल्वे सेवा पूर्णपणे पूर्ववत होऊ शकली नाही. यामुळे सध्या दादर स्थानकावर गाड्यांची गर्दी पाहायला मिळत आहे.
मध्य रेल्वेची वाहतूक केवळ दादरपर्यंतच मर्यादित ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या प्रवाशांना दादरला उतरून पर्यायी व्यवस्था शोधावी लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या दादर स्थानकावर हजारो प्रवाशांची गर्दी झाली आहे. रेल्वेकडून सतत याबद्दलच्या सूचना दिल्या जात होत्या. मात्र तरीही अनेक प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे. एल्फिन्स्टन पुलासाठी घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकचा मोठा फटका एक्सप्रेस गाड्यांना बसला आहे. मुंबईत येणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या भायखळा आणि दादर स्थानकांवरच थांबवण्यात आल्या. तर काही संथ गतीने चालवण्यात आल्या. त्यामुळे अनेक प्रवाशांना त्यांच्या गंतव्य स्थानकात पोहोचण्याठी उशीर झाल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान १९१३ मध्ये बांधण्यात आलेला हा पूल मुंबईच्या पश्चिम आणि मध्य रेल्वेला जोडणारा महत्त्वाचा दुवा होता. मात्र, काळानुरूप हा पूल कमकुवत झाला होता. २०१७ च्या चेंगराचेंगरीच्या भीषण घटनेनंतर या परिसरातील पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. आता हा जुना पूल पूर्णपणे हटवल्यामुळे त्या जागी अधिक क्षमतेचा आणि रुंद अशा नवीन पुलाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
