इराण युद्धात मुलाने गमावला जीव, पार्थिव मिळवण्यासाठी बापाची महिनाभरापासून तडफड; भारत सरकारकडे 3 मागण्या
ओमानच्या किनाऱ्याजवळ मालवाहू जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्यात मुंबईच्या दीक्षित सोलंकी यांचा मृत्यू झाला असून, महिनाभर पार्थिव न मिळाल्याने कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

पश्चिम आशियातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका मुंबईतील एका कुटुंबाला बसला आहे. ओमानच्या समुद्रकिनाऱ्याजवळ एका मालवाहू जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्यात मुंबईच्या कांदिवलीतील ३२ वर्षीय खलाशी दीक्षित अमृतलाल सोलंकी यांचा मृत्यू झाला. या घटनेला एक महिना उलटला आहे. मात्र अद्याप दीक्षित यांचे पार्थिव भारतात आलेले नाही. या पार्श्वभूमीवर आता त्यांचे वृद्ध वडील आणि बहिणीने न्यायासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.
नेमकी घटना काय?
दीक्षित सोलंकी हे ‘एमटी एमकेडी व्योम’ (MT MKD Vyom) या ऑईल टँकरवर ऑयलर म्हणून कार्यरत होते. १ मार्च २०२६ रोजी हे जहाज ओमानच्या किनाऱ्याजवळून जात असताना त्यावर ड्रोन हल्ला झाला. या भीषण हल्ल्यामुळे जहाजाच्या इंजिन रूममध्ये मोठा स्फोट होऊन भगदाड पडले. सुरुवातीला दीक्षित बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले, मात्र दुसऱ्या दिवशी शोध मोहिमेदरम्यान जहाजाच्या तुटलेल्या भागाजवळ त्यांचा मृतदेह आढळला. या जहाजावरील इतर २१ कर्मचारी सुखरूप आहेत. मात्र दीक्षित या युद्धाच्या आगीत बळी पडलेले पहिले भारतीय ठरले.
दीक्षित सोलंकी यांचा मृत्यू झाल्यानंतर एक महिना उलटला आहे. तरी अद्याप त्याचे पार्थिव त्याच्या कुटुंबियांकडे देण्यात आलेले नाही. याप्रकरणी आता दीक्षित यांचे वडील अमृतलाल सोलंकी (६४) आणि बहीण मिताली सोलंकी (३३) यांनी गुरुवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावेळी त्यांनी विविध आरोप केले आहे. माझा मुलगा दीक्षित सोलंकीचा ३३ दिवसांपूर्वी मृत्यू झाला. त्याचा मृतदेह कधी येणार, यावर अधिकारी स्पष्ट उत्तर देत नाहीत. आम्हाला केवळ मृत्यूची बातमी दिली गेली, पण नेमकी दुर्घटना कशी घडली याचे फोटो, व्हिडिओ किंवा तपास अहवाल अद्याप शेअर केलेले नाहीत. माझ्या मुलाला तिथे मरण्यासाठी सोडून दिले होते का? त्याला किती त्रास झाला असेल? असे भावनिक सवाल त्याचे वडील उपस्थित करत आहेत.
या याचिकेद्वारे सोलंकी कुटुंबाने केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणांकडे काही मागण्या केल्या आहेत. दीक्षित सोलंकी यांचे पार्थिव तातडीने भारतात आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने हस्तक्षेप करावा. तसेच मृत्यूशी संबंधित सर्व न्यायवैद्यक (Forensic) पुरावे आणि तपास अहवाल कुटुंबाला सोपवण्यात यावेत. संबंधित शिपिंग कंपनी आणि मंत्रालयाने या प्रकरणातील विलंबाची जबाबदारी घ्यावी, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत. या याचिकेत परराष्ट्र मंत्रालय, बंदरे व जहाजबांधणी मंत्रालय आणि ‘व्ही शिप्स इंडिया’ कंपनीला प्रतिवादी करण्यात आले आहे.
पश्चिम आशियातील तणावाचा परिणाम
दरम्यान इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे सध्या पश्चिम आशियातील सागरी मार्ग असुरक्षित झाले आहेत. या तणावामुळेच पार्थिव परत आणण्याच्या प्रक्रियेत तांत्रिक आणि राजनैतिक अडचणी येत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, लाडक्या मुलाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी सोलंकी कुटुंब हताशपणे न्यायालयाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहे. या प्रकरणाची सुनावणी पुढील आठवड्यात पार पडण्याची शक्यता आहे.
