गंगा स्नानासाठी उतरलेल्या मुंबईतील मेडिकलच्या तीन विद्यार्थिनी नदीत वाहून गेल्या
मुंबईच्या विविध भागात राहणाऱ्या पाच मित्र-मैत्रिणींचा ग्रुप 30 जुलै रोजी उत्तराखंडमधील हरिद्वार येथे पिकनिकसाठी गेला होता. मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थिनी यावेळी गंगा नदीत वाहून गेल्या.
मुंबई : हरिद्वारमध्ये गंगा नदीत स्नान करण्यासाठी उतरलेल्या मुंबईतील तीन विद्यार्थिनी वाहून गेल्याची दुर्घटना उघडकीस आली आहे. गंगेच्या खोल पाण्यात उतरलेल्या तिघी युवती नदीच्या प्रवाहामुळे वाहून गेल्याची माहिती आहे. अद्याप तिघींचाही शोध लागलेला नाही. वैद्यकीय शिक्षण घेणारे मुंबईतील पाच जण उत्तराखंडला गेले होते.
मुंबईतील पाच मित्र-मैत्रिणींचा ग्रुप
मुंबईत मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थिनी हरिद्वारमध्ये गंगा नदीत वाहून गेल्या. या घटनेमुळे त्यांचे कुटुंबीय आणि मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे. मुंबईच्या विविध भागात राहणाऱ्या पाच मित्र-मैत्रिणींचा ग्रुप 30 जुलै रोजी उत्तराखंडमधील हरिद्वार येथे पिकनिकसाठी गेला होता. कांदिवली, बोरिवली आणि मीरा रोड परिसरात राहणाऱ्या या पाच जणांमध्ये 4 मुली आणि एका मुलाचा समावेश आहे.
गंगा नदीच्या पाण्याला प्रचंड प्रवाह
बुधवारी दुपारी दोन वाजता हे सर्व जण गंगा नदीत स्नान करण्यासाठी उतरले होते. त्यांनी पैशाचे नाणे नदीत टाकले. त्यानंतर करण मिश्रा आणि एक युवती पाण्यातून बाहेर आले, पण इतर तिघी जणी आणखी खोल पाण्यात गेल्याचं सांगितलं जातं. मात्र गंगा नदीच्या पाण्याला प्रचंड प्रवाह असल्यामुळे या मुली पाण्यासोबत वाहून गेल्या. गंगा नदीत उतरल्याच्या वेळी एकीने त्यांचा पहिला व्हिडीओ काढला होता. यामध्ये त्या तिघीही मुली पाण्यात डुंबताना दिसत आहेत.
सहा तासांच्या शोधानंतरही बेपत्ता
करण मिश्राने याची माहिती ते सर्व जण जिथे थांबले होते, त्या हॉटेल चालकाला दिली. त्यानंतर स्थानिक पोलिसांना याविषयी सांगण्यात आले. तातडीने शोध कार्य सुरु करण्यात आले, मात्र सहा तास शोध घेऊनही या तिन्ही मुली सापडल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे.
संबंधित बातम्या :
Video | पुराच्या पाण्यात बैलगाडी नेण्याचा प्रयत्न अंगलट, बैलाचा मृत्यू, शेतकरी बेपत्ता
VIDEO | पुराच्या पाण्यात बाईक घालण्याचं धाडस अंगलट, कृषी केंद्र संचालकाचा वाहून गेल्याने मृत्यू