अजितदादांच्या निधनानंतर पहिलाच वर्धापन दिन राष्ट्रवादीनं पुढं ढकलला… दिल्लीत मोठी घडामोड काय?
Ajit Pawar NCP Anniversary: अजितदादांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पहिलाच वर्धापन दिन पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामागे दिल्लीतील एक महत्त्वाची घडामोड असल्याची माहिती समोर येत आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याविषयीची माहिती दिली आहे.

Ajit Pawar NCP Anniversary: शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली. अजितदादांच्या नेतृत्वातील पक्षाने भाजपची साथ दिली. हा पक्ष महायुतीत सहभागी झाला. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीचे वर्धापन दिन साजरे झाले. अजितदादा यांचे बारामती विमानतळावरील विमान अपघातात अकाली निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिलाच वर्धापन दिन 10 जून रोजी होणार होता. दोन्ही राष्ट्रवादीचे वर्धापन दिन मुंबईत होणार असल्याचे समोर येत होते. पण आता दादांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन एक दिवसाने पुढे ढकलत असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. पक्षाचा 27 वा वर्धापन दिन सोहळा आता 11 जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये हा कार्यक्रम होईल.
NDA च्या बैठकीमुळे वर्धापन दिन पुढे ढकलला
10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन करण्यात आली होती. शरद पवार यांनी हा पक्ष स्थापन केला होता. दरवर्षी 10 जून रोजी वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. यंदा दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (NDA) एक अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला एनडीएच्या घटक पक्षातील सर्वच प्रमुख नेते हजर असतील. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे उपस्थित असतील.
वर्धापन दिन 11 जून रोजी
अजितदादांच्या अकली निधनानंतर पक्षातील अनेक घडामोडी चव्हाट्यावर आल्या. विलिनीकरणाचा मुद्दा सर्वाधिक गाजला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का यावरून वादळ उठले. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदाबाबत निवडणूक आयोगाचा पत्र व्यवहार वादात सापडला. त्यानंतर काही मंत्र्यांची प्रकरणं समोर आली. अजितदादांच्या विमान अपघातावरून काहूर उठले. दोन्ही राष्ट्रवादीतील काही नेत्यांच्या एकमेकांवरील टोकाच्या टीका समोर आल्या. त्यामुळे एकूणच या वर्धापन दिनाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. वर्धापन दिन एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. 10 जून ऐवजी 11 जून रोजी वर्धापन दिन होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. दिल्लीवरून परतल्यानंतर मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये वर्धापन दिन साजरा होईल.