AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कुचाळक्या थांबवा, चाचण्या वाढवा’, जितेंद्र आव्हाडांचं खरमरीत पत्र

महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या कोरोना संसर्गाच्या काळातील मदत कार्याची चेष्टा करणाऱ्यांना चांगलंच खरमरीत पत्र लिहिलं आहे (Open letter of Jitendra Awhad amid Corona).

'कुचाळक्या थांबवा, चाचण्या वाढवा', जितेंद्र आव्हाडांचं खरमरीत पत्र
| Updated on: Apr 14, 2020 | 5:31 PM
Share

मुंबई : महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या कोरोना संसर्गाच्या काळातील मदत कार्याची चेष्टा करणाऱ्यांना चांगलंच खरमरीत पत्र लिहिलं आहे (Open letter of Jitendra Awhad amid Corona). यात त्यांनी टीकाकारांना ‘कुचाळक्या थांबवा, चाचण्या वाढवा’ असा सल्ला दिला आहे. माझ्या सतत संपर्कात असणारी एक व्यक्ती कोरोनाबाधित आहे हे कळल्यानंतर मी स्वतः डॉक्टरी सल्ल्यानुसार क्वारंटीनमध्ये गेलो. माझी चाचणी निगेटिव्ह आली असली, तरी मी 7 दिवसांनी होणाऱ्या दुसऱ्या चाचणीपर्यंत आणि त्यानंतर डॉक्टरांनी अनुमती देईपर्यंत घराबाहेर पडणार नाही, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं आहे.

आपल्या पत्रात जितेंद्र आव्हाड म्हणाले, “एक साधा विचार मनात आला. आज खासगी, अत्याधुनिक केंद्रात ज्यासाठी साडेचार हजार रुपये मोजावे लागतात ती कोरोनाची चाचणी आपल्या देशात किती लोकांना परवडू शकते? सरकारी केंद्रात तिचा रिझल्ट यायला 5 दिवस लागतात. 60 % बाधितांना सर्दी, खोकला, ताप अशी कुठलीही लक्षणं दिसत नाही. हे लक्षात घेता, रिझल्ट येईपर्यंत ती व्यक्ती दगावू शकते. त्यामुळेच मी आणि माझ्या पत्नीने एक निर्णय घेतला. आमच्या संपर्कातील किंवा ओळखीपाळखीच्या सगळ्यांचीच आपण स्वखर्चाने चाचणी करुया. त्यापैकी 80 लोकांची चाचणी खासगी ठिकाणी स्वखर्चाने करून घेतली. 80 जणांपैकी 8 जण Positive निष्पन्न झाले. अजून 40 कर्मचाऱ्यांच्या चाचण्या आम्ही स्वखर्चाने करून दिल्या. त्यामधील 3 जण हे कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यांचा आमच्याशी कधी संपर्क देखील आला नाही. पण, हे करण्याचे कारण एकच होतं कि, आमच्या मानवी संवेदना जाग्या आहेत.”

या देशामध्ये सार्वत्रिक चाचण्या (Mass Testing) होत नसल्यामुळे कदाचित आपल्याला कोरोना संसर्गाची निश्चित संख्या कळत नाही. पण, आपल्या खिशात असलेल्या दोन पैशाचा वापर दुसऱ्यासाठी करावा ही मानसिकता नसलेले लोक या सगळ्याच गोष्टींची टिंगल करताना दिसत आहेत. यामधून होणारा सामाजिक द्वेष, यामधून होणारी सामाजिक हेटाळणी याचा अंदाज अजून अनेकांना आलेला नाही. ज्या झोपडपट्टीमध्ये कोरोना लागण झालेलं घर सापडतं, त्या झोपडपट्टीमधून त्याला बाहेर काढल जातं. किंबहुना त्याच्या घरादारासकट त्याच्या मुलाबाळासकट त्याला बाहेर फेकलं जातं. हे किती जणांना माहितीये. बातम्यांसाठी किंवा दिवसभर एखादा विषय चघळण्यासाठी ठिक आहे. पण, त्याचे सामाजिक परिणाम, दुष्परिणाम याचा कधी कोणी विचार केला आहे का? असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.

“मी वाटप करत असलेल्या 80 हजार खिचडी वाटपाचं काय होणार?”

जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या मदत कार्याची हेटाळणी करणाऱ्यांना या पत्रात चांगलंच फैलावर घेतलं. ते म्हणाले, “आज (14 एप्रिल) एकनाथ शिंदे यांनी सगळ्या पत्रकारांच्या चाचण्या करुन घेतल्या. त्यामधील किती निगेटिव्ह आणि किती पॉझिटिव्ह हे सांगण्याची बाब नाही. पण, असे सामाजिक जाणीव असलेले नेते समाजामध्ये हे युद्ध पुढे येऊन लढत आहेत. आज मुंब्रा-कळवामध्ये मी आणि माझी पत्नी मिळून 80 हजार खिचडीचे वाटप करत होतो. आज आम्ही दोघेही घरी बसलो आहोत. जेव्हा एखादा सेनापती घरी बसतो तेव्हा त्याचे मागचं सैन्य मरगळतं. आज या 80 हजार खिचडी वाटपाचं काय होणार? हे कालपासून हेटाळणी आणि कुचाळक्या करणारे लोक सांगतील का? त्यांच्यात हिम्मत आहे का तिथे जाऊन लोकांना जेवण वाढायची.”

प्रत्येक युद्धामध्ये थोड्याशा अडचणी येतातच. म्हणून त्या युद्धातून आपण पळ काढणं याला नेतृत्व म्हणत नाही यावर माझा ठाम विश्वास आहे. गेले 20-25 दिवस मी स्वत: जनतेमध्ये फिरतोय. होय मला लोक मूर्ख म्हणतात, वेडा म्हणतात पण, मी आहे तसा. मी लोकांची सेवा केली हे मी माझं भाग्य समजतो. कारण, अशी संधी फार कमी वेळा येते. आज जर आपण या लोकांची भूक भागवू शकलो नाही. तर कोरोनापेक्षा एका भयंकर युद्धाला देशाला सामोरे जावे लागेल. ते युद्ध कदाचित आपण मुद्दामून डोळ्याआड करत आहोत. कोरोनापेक्षा गल्लीबोळामध्ये फिरून लोक अन्नधान्यासाठी किती त्रस्त आहेत याची माहिती घेतली तर त्यामधील पॉझिटिव्ह माहिती आपण सरकारला देऊ शकू आणि सरकारला मार्ग काढण्यासाठी मदत करु शकू, असंही त्यांनी या पत्रात म्हटलं.

“उद्या अराजकता निर्माण झाली तर त्याला नियंत्रित कोण करणार?”

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “काल (13 एप्रिल) रात्री माझे धनंजय मुंडे आणि अनिल देशमुख यांच्याशी बोलणं झालं. त्यांना हे सगळ समजल्यावर त्यांनी या स्तुत्य उपक्रमाचं कौतुकच केलं. ते म्हणाले असे मास टेस्टींग (Mass Testing) आपण सर्व मंत्र्यांनी देखील केले पाहिजे. आपल्या संपूर्ण कर्मचाऱ्यांची तपासणी करुन घेतली पाहिजे. ही एक सामाजिक जबाबदारी आहे. त्याच्याकडे सामाजिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. माझा कुठलाही कुक हा पॉझिटीव्ह नसताना अशा बातम्या देणं याला काय म्हणायचं. म्हणजे आपल्याला माणूसकीचा स्पर्श नाही हे यामधून दिसतं. कोणाला खात्री करुन घ्यायची असेल तर माझा कुक आताही खाली बसलेला आहे आपण येऊन त्याच्याबरोबर फोटो काढून जा. बातम्या देताना त्या कमीत-कमी तपासून केल्या असतील तर बर होईल ना. पण, अशा युद्धांमध्ये मानवी स्पंदन, मानवी स्पर्श, मानवी दृष्टीकोन हे जिवंत ठेवावेच लागतील. अन्यथा आमच्यासारखे नेते जर घरातच बसले आणि संपर्काच्या बाहेरच गेले तर उद्या अराजकता निर्माण झाली तर त्याला नियंत्रित कोण करणार?”

जर या चाचण्या झाल्या नसत्या तर हा आजार किती पसरला असता याची कल्पनाच न केलेली बरी. मी काही फार मोठा तीर मारला असा माझा दावा नाही. एक सामाजिक जाणीव म्हणून मी हे केलं. मंत्रिमंडळातील माझे सहकारी एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ठाण्यातील तमाम पत्रकारांच्या चाचण्या करून घेतल्या. जे मी केलं ते उद्या धनंजय मुंडे सुद्धा करणार आहेत. कारण ही एक चांगलीच गोष्ट आहे. आपल्या माणसांची आपण काळजी नाही घेणार तर मग कोण घेणार, असंही आव्हाड यांनी नमूद केलं.

“टवाळखोर बातम्या चघळणाऱ्या प्रसारमाध्यमांचा संताप येतो”

जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांवरही टीका केली. ते पुढे म्हणाले, “जितेंद्र आव्हाड क्वारंटाईन झाले कारण त्यांच्या अमुक नोकरामुळे किंवा तमूक पोलिसामुळे त्यांना संसर्ग झाला असल्याच्या कुचाळक्या करणाऱ्या, टवाळखोर बातम्या चघळणाऱ्या प्रसारमाध्यमांचा मला खरोखर संताप येतो. मुळात, कुणालाही असा दुर्धर आजार होणं ही काय गॉसिप करायची गोष्टी आहे? तुमच्यातल्या मानवी संवेदना पार संपल्या का? की पेपर खपवण्यासाठी यांनी त्या गहाण टाकल्या? जे मी, एकनाथ शिंदे करत आहोत ते करायची ताकद असलेला एक प्रचंड मोठा उच्चभ्रू मध्यमवर्ग आणि धनिक वर्ग आपल्या देशात आहे. आपल्या खिशात जर 10 हजार असतील तर 4 हजार रुपयाची टेस्ट एखाद्या गरीबाची करुन घेण्याची दानत दाखवली तर हा रोग आटोक्यातच येईल. पण, त्याचबरोबर आपल्या घरात जेवायला मिळतेय तर प्रत्येक घराने जर बाजूच्या गरीबाला किंवा समोरच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला दररोज एक डब्बा पाठवला, दोन घरं जेवली तरी पुण्य लागेल.”

ही परिस्थिती किती भयंकर आहे हे ऑफिसमध्ये बसून किंवा वर्क फ्रॉम होम करुन समजणार नाही. त्यासाठी गल्लीबोळात उतरावं लागेल. मी अभिमानाने सांगतो कि गेले 20 ते 25 दिवस मी गल्लीबोळात फिरतोय. तेव्हा मला माहितीये कि किती स्फोटक वातावरण आज गल्लीबोळामध्ये तयार झालं आहे. मी जरी होम क्वारंटाईन असलो तरी पुढच्या 6-7 दिवसांत मी परत बाहेर पडेन. परत माझ्या जनतेमध्ये जाईन. या युद्धामध्ये एक अग्रेसर सेनापती म्हणून जनतेची सेवा करेन. तुम्हाला जे काय लिहायच ते लिहा. जी काय टिंगल करायची ती करा. तुमच्या टिंगल टवाळीने आमच्या सारखे नेते थांबत नसतात, असंही ते म्हणाले.

“जगात भारतामध्येच पहिल्यांदा प्रतिकारशक्ती निर्माण होतेय”

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “माझ्यासह 80 जणांची चाचणी करण्यात आली. त्यामधील 8 जण लक्षणं न दिसणारे होते. याचा अर्थ त्यांना कुठलीही लक्षणे दिसत नव्हती. मी माझ्या काही डॉक्टर आणि मायक्रोबायोलॉजिस्ट मित्रांशी चर्चा केली. त्यांचं म्हणणं असं आहे की, याचा अर्थ भारतातील लोकांमध्ये एक प्रतिकारशक्ती निर्माण होतेय. याला आपण अँटीबॉडीज (antibodies) म्हणतो. ती प्रतिकारशक्ती या व्हायरसला शरीरात जाण्यापासून रोखते आहे. हा व्हायरस शरीरात जाण्याचा मुख्य मार्ग म्हणजे आपले नाक आहे. यामध्ये अभ्यासपूर्ण मी लिहू शकत नाही. कारण मी यामधील तज्ज्ञ नाही. पण, अशा लक्षणं नसणाऱ्या व्यक्तींना रुग्ण म्हणून जाहीर करणं मला क्रुरता वाटते.”

संबंधित व्यक्तीला जोपर्यंत पूर्णत: लक्षणं दिसत नाहीत तोपर्यंत त्यांना रोगी समजायचं का? हा माझा प्रश्न आहे. हे मी गेले 25 दिवस फिरल्यानंतर माझे वैयक्तिक मत जाहीर करतो आहे. भारतामध्ये पहिल्यांदा जगात प्रतिकारशक्ती निर्माण होतेय हे दिसतंय. त्यामुळेच कमी चाचण्या करुन पण, खूप जास्त लोकांना रोगाची लागण झाली आहे असं दिसत नाही. ज्यांना लागण झाली आहे अशा लक्षणं नसणाऱ्या रुग्णांची संख्या हजारोंच्या संख्येत असेल. त्यांच्या शरीरातील प्रतिकारशक्ती आज या रोगाविरुद्ध रोगाशी दोन हात करताना दिसतेय आणि त्यात भारत देश यशस्वी देखील होईल, असंही आव्हाड म्हणाले.

आपल्या पत्राच्या अखेरीस आव्हाड यांनी टीकाकारांना एक टीप लिहित सल्लाही दिला. ते म्हणाले, “ज्यांनी आपल्या वॉचमनलाही जेवण दिले नसेल किंवा या अडचणीच्या काळात आपल्या मोलकरणीलाही धान्य दिले नसेल त्यांनी उगाच नको त्या सूचना करुन वेळ वाया घालवू नये.”

संबंधित बातम्या :

मुंबईतील कोरोना हॉटस्पॉट सातवरुन पाचवर, ‘जी दक्षिण’मध्येच तीनशेपार रुग्ण

Lockdown Extension : मोदींनी वाढवलेल्या लॉकडाऊनवर एकनाथ खडसे म्हणतात….

लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढला, रेल्वे आणि विमान वाहतुकीचं काय?

पुण्यात किरकोळ भाज्यांचे दर गगनाला, कोरोना संकट काळात ग्राहकांच्या खिशाला कात्री

कोरोना लढ्यासाठी टास्क फोर्स, डॉ. संजय ओक यांची अध्यक्षपदी नियुक्ती

Open letter of Jitendra Awhad amid Corona

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.