हिंदी नाही म्हणजे नाहीच, राज ठाकरे कडाडले, 6 जुलै रोजी मुंबईत महामोर्चा; सरकारला दाखवणार ताकद

शाळेत पहिली इयत्तेपासून हिंदी भाषेच्या सक्तीच्या निर्णयाविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यासाठी ते 6 जुलै रोजी मोर्चा काढणार आहेत. गिरगाव चौपाटीवरून या मोर्चाची सुरुवात होईल, असं त्यांनी सांगितलं.

हिंदी नाही म्हणजे नाहीच, राज ठाकरे कडाडले, 6 जुलै रोजी मुंबईत महामोर्चा; सरकारला दाखवणार ताकद
Raj Thackeray PC
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 26, 2025 | 2:07 PM

विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदीचा पर्याय देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या 6 जुलै रोजी गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. हिंदीची सक्ती होऊ देणार नाही, असं त्यांनी ठामपणे म्हटलंय. महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे सरकारला दाखवणार आहोत, असंही ते म्हणाले. राज्यात पहिल्या इयत्तेपासून तिसऱ्या भाषेचं शिक्षण अनिवार्य करतानाच ही भाषा हिंदीच राहील, असं शुद्धिपत्रक राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने मंगळवारी रात्री उशिरा जारी केलं. अन्य भाषांच्या शिक्षणासाठी अटींचे अडथळे ठेवतानाच शिक्षण विभागाने अप्रत्यक्षपणे हिंदीची सक्ती केली. त्याविरोधात मनसेनं परखड भूमिका जाहीर केली.

याविषयी राज ठाकरे म्हणाले, “शिक्षणमंत्री दादा भुसे येऊन गेले. त्यांनी त्यांची भूमिका सांगण्याचा प्रयत्न केला, जी मी संपूर्णपणे फेटाळून लावली. आम्हाला ते मान्य नाही म्हणून सांगितलं. पाचवीनंतरच तिसऱ्या भाषेचा विषय येतो. त्यांनी हे मान्य केलं की, राष्ट्रीय शिक्षण धोरणात कोणत्याही गोष्टीचा समावेश नाही. राज्यांवर टाकलेली गोष्ट आहे. राज्यावर गोष्ट टाकली तर हे का करत आहे, हे अजूनही अनाकलनीय आहे.
सीबीएससी शाळा या नव्याने आल्या. त्या आयएएस अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी काढलेल्या शाळा होत्या. त्या शाळांचा वर्चस्व राज्यातील शाळांवर करण्याचा प्रयत्न आहे. तोच केंद्र आणि आयएएस अधिकाऱ्यांचा अजेंडा आहे. महाराष्ट्र हे का करतोय? काही राज्य करत नाही. त्यांच्याकडे काही गोष्टींचं उत्तर नव्हतं. तेच तेच म्हणत होते. आमचा या सर्व गोष्टीला विरोध होता, असेल आणि राहणार.”

6 जुलै रोजी महामोर्चा

“आम्ही हिंदीची सक्ती होऊ देणार नाही. येत्या ६ जुलै रोजी गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चाचा कोणताही झेंडा नसेल, तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल. मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल. साहित्यिक, शिक्षण तज्ज्ञ आणि इतरांशी बोलणार आहोत. आम्ही त्यांना आमंत्रण देणार आहोत. सर्व पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांना बोलवणार आहोत. महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे सरकारला दाखवणार आहोत. सरकारला ताकद दाखवणार आहोत. रविवारी सर्वांना येता यावं म्हणून तो दिवस निवडला आहे. सर्व राजकीय पक्षांशी मी बोलणार आहे,” असंदेखील त्यांनी स्पष्ट केलं.

“याला कटच म्हणावं लागेल”

हिंदी भाषासक्तीच्या राज्य सरकारच्या निर्णयाला त्यांनी ‘कट’ असं म्हटलंय. “हा जो कट आहे, याला कटच म्हणेल. महाराष्ट्रातील मराठीपण घालवण्यासाठी हा कट आहे. तो उद्ध्वस्त करण्यासाठी तमाम मराठी बांधवांनी, भगिनींनी, सर्वांनी या मोर्चात सहभागी व्हावं ही विनंती आहे. या मोर्चाचा अजेंडा हा फक्त मराठी असेल. या अजेंड्यासाठी मराठी माणसांनी सहभागी व्हावं. सरकारला दाखवावं. साहित्यिक एलकुंचवार यांनीही विरोध केला आहे. राजकीय पक्षांव्यतिरिक्त या मोर्चात कोण कोण सहभागी होतात हे मला पाहायचं आहे. कोण येणार नाही हेही मला पाहायचं आहे. नुसतंच तोंडदेखले बाकीचे बोलत असतात. ही महत्त्वाची लढाई आहे. या लढाईत संपूर्ण महाराष्ट्राने उतरावं. 6 तारखेला सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवरून मोर्चा निघेल,” असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय.

Follow Us