MNS : ‘तुमची ताकद आम्हाला 4 तारखेला दाखवा, या भैय्या लोकांना महाराष्ट्र आणि मुंबईतून..’ मनसेचं ओपन चॅलेंज
MNS : रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची करण्यात आली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यावरुन वादविवाद सुरु आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या निर्णयाचं समर्थन केलं आहे.

महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा बंधनकारक करण्यात आली आहे. त्यांना ग्राहकांशी मराठीत बोलावं लागेल. येत्या 1 मे पासून या आदेशाची अंमलबजावणी सुरु होणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या या निर्णयावर मोठा वादही सुरु झाला आहे. शिवसेनेतूनच संजय निरुपम या सक्तीच्या विरोधात आहेत. मराठी लिहिता आणि वाचता न येणाऱ्या रिक्षा किंवा टॅक्सी चालकांचे परवाने येत्या 1 मे पासून रद्द करण्याचा इशारा सरनाईक यांनी दिला आहे. या मराठी सक्तीच्या विरोधात येत्या 4 मे पासून 15 लाख रिक्षाचालकांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा रिक्षा, टॅक्सी चालकांवर मराठी सक्तीच्या बाजूने मैदानात उतरली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी इशारा दिला आहे.
“ज्या पद्धतीने मुंबईला बंद पाडण्याची धमकी देत देत आहेत, धमकी देणाऱ्या भैय्याला धडा शिकवण्याची हीच ती योग्य वेळ आहे. मुंबई आमच्याशिवाय चालूच शकत नाही अशांना धडा शिकवा. स्थानिक भाषा येत नसताना देखील यांना लायसन्स दिली कोणी? अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे” अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे. “10-12 शब्द कशाला, पूर्ण मराठी भाषा येणं गरजेचं आहे. राज्यात काम करताना पैसे कमावता, इकडे पोट भरता, मग भाषा का नाही येत?” असं संदीप देशपांडे यांनी विचारलं आहे.
एवढ करून देखील भैय्या लोक त्याला मतदान करत नाहीत
“आमच्या राज्यात यायला भाषेची गरज आहे. यूपीमध्ये मराठी भाषा शिकवली पाहिजे. भविष्यात आपल्या राज्यावर संकट येऊ शकतं. संजय निरुपम हा अतिशय टुकार माणूस आहे. एवढ करून देखील भैय्या लोक त्याला मतदान करत नाहीत. तुमची ताकद आम्हाला 4 तारखेला दाखवा. या भैय्या लोकांना महाराष्ट्र आणि मुंबईतून बाहेर पाठवण्याची वेळ आली आहे” असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिली.
लोढा कट्टर मराठी विरोधी
“भाजपचा रडीचा डाव आहे, महिला बिल आणताय ना? मग महिलेचा संताप सहन करायला शिका” अशी टीका भाजपच्या जनआक्रोश मोर्चावर त्यांनी केली. ” लोढा कट्टर मराठी विरोधी आहे. मुंबईने मंगल प्रभात लोढाला एवढ मोठं केलं, तोच कट्टर मराठी द्वेषी आहे. मागेच म्हटलं होतं, मुंबई महापालिका भूखंडाचे श्रीखंड करत आहे. KEM आणि एकलव्यचा काय संबंध? आमच्या मनोज चव्हाण यांनी पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच नाव द्यावं अशी मागणी केली आहे ती योग्य आहे” असं संदीप देशपांडे म्हणाले.
