Rajya Sabha: आयारामांना नाही, निष्ठावंतांना संधी द्या! राज्यसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची फिल्डिंग, या नेत्यांची नावं आघाडीवर

Rajya Sabha Election 2026 BJP Candidate: राज्यसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यातून 7 जागांपैकी 6 जागांवर महायुतीचे खासदार निवडणून जातील. तर त्यातील चार जागा या भाजपच्या पारड्यात जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे. कोणाचं नाव आहे आघाडीवर?

Rajya Sabha: आयारामांना नाही, निष्ठावंतांना संधी द्या! राज्यसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची फिल्डिंग, या नेत्यांची नावं आघाडीवर
राज्यसभा, भाजप
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 19, 2026 | 9:41 AM

Rajya Sabha Election 2026 BJP Candidate: राज्यसभेच्या एकूण 37 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 5 मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे. तर 16 मार्च रोजी मतदान होणार आहे. सध्याच्या खासदारांचा कार्यकाळ हा येत्या 2 एप्रिल रोजी संपणार आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला सात जागा आहेत. भाजपचे चार तर मित्र पक्ष शिंदेसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रत्येकी एक खासदार राज्यसभेवर निवडल्या जातील. या चार जागांसाठी भाजपमध्ये चुरस दिसून येत आहे. भाजपच्या निष्ठावंतांनी आयाराम-गयारामांविरोधात सूर आळवल्याची सूत्रांची माहिती आहे. राज्यसभेवर वर्णी लावण्यासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे. भाजप कोट्यातील चार जागांसाठी काही नेत्यांची नावं आघाडीवर आहेत.

आयाराम विरुद्ध निष्ठावंत

राज्यातील भाजपच्या वाट्याला चार जागा येणार आहेत. पण भाजपमध्ये राज्यसभेसाठी आयारामांना संधी मिळू नये यासाठी निष्ठावंतांनी कंबर कसल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या काही वर्षात पक्षात इतर पक्षातून आलेल्यांची संख्या वाढली आहे. त्यात अनेक बडी नावं सुद्धा आहेत. बाहेरून आलेल्यांना लागलीच मोठी पदं देण्यात आल्याने निष्ठावंत नाराज आहेत. विधान परिषदेसह राज्यसभेवर आता निष्ठावंतांना संधी द्यावी अशी मागणी पक्षातील जुन्या नेत्यांकडून रेटण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. अर्थात ज्यावेळी नावं समोर येतील त्यावेळी कुणाची नाराजी असल्यास ती व्यक्त होण्याची शक्यता आहे.

या नावांची सर्वाधिक चर्चा

विनोद तावडे

विजया रहाटकर

भागवत कराड

धैर्यशील पाटील

रामदास आठवले

राज्यात हे खासदार होणार निवृत्त

महाराष्ट्रातून राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान, उद्धव ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसच्या रजनी पाटील, भाजपचे भागवत कराड, धैर्यशील पाटील आणि रामदास आठवले यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपत आहे. महाविकास आघाडीचे चार तर भाजप आणि आठवले मिळून तीन खासदार निवृत्त होत आहेत. यामधील कराड, पाटील यांच्या नावाची पुन्हा चर्चा सुरू आहे. त्यांना पुन्हा पक्ष संधी देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. तर नवीन चेहरे कोण असतील याची ही उत्सुकता आहे.

राज्यसभेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

राज्यसभेच्या 37 जागांसाठी 26 फेब्रुवारी रोजी नोटिफिकेशन काढण्यात आले. येत्या 5 मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येईल. तर 6 मार्चपर्यंत अर्जांची छाननी होईल. 9 मार्च रोजीपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची संधी आहे. 16 मार्च रोजी सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर संध्याकाळी 5 वाजेपासून मत मोजणीला सुरुवात होईल. 20 मार्चपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे.