
Sanjay Raut Criticized BJP : खासदार संजय राऊतांनी भाजपवर मोठा हल्लाबोल चढवला. सध्याच्या राज्यातील मुद्दांना हात घालत राऊतांनी भाजपवर निशाणा साधला. मत चोरी, घोटाळे यातूनच महायुतीचा विजय झाल्याचा आरोप त्यांनी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला. तर शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष कार्यकर्त्यांना बळ देत असल्याचे सूचक वक्तव्य करायला ते विसरले नाहीत. त्यांच्या या नवीन दाव्यामुळे महाविकास आघाडीत मनसेची एंट्री उशीरा का होईना होईल असे संकेत मिळत आहेत. अर्थात याविषयीची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
ऐसा कोई सगा नही…
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देशावर संकट आले की, काही मोठे लोक मदतीसाठी माझे नाव घेतात, ही बारामतीची ताकद आहे. काम द्यायचे असेल तर बारामतीच्या तरुणांना द्यावे, असा संदेश देशात गेला पाहिजे असे वक्तव्य काल केले. तर दुसरीकडे सोलापूरमध्ये ऑपरेशन लोट्सच्या वर्दीने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चार माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनी काहूर उठवले आहे.
या दोन्ही घडामोडींचा आधार घेत संजय राऊतांनी भाजपवर घणाघाती टीका केली. ऐसा कोई सगा नही, जिसे भाजपने ठगा नही असा ठेवणीतील गोळाबारूद त्यांनी बाहेर काढला आणि ऐन दिवाळीतच त्याचा बार उडवला. अजित पवार हे भाजपपुढे किस खेत की मुली असल्याचा चिमटा त्यांनी काढला. त्यांच्या या जिव्हारी लागणाऱ्या टीकेवर आता भाजपमधून काय पलटवार होतो, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.
राजकारणात तुम्ही एकमेकांवर तुम्ही कितीही टीका केली तरी संकटकाळात सह्याद्रीच हिमालयाच्या मदतीला धावून जात असतो. ज्याअर्थी शरद पवारांनी सांगितले आहे, त्याअर्थी गेल्या काही वर्षात ज्या काही घटना घडल्या त्याचा सारांश त्यांनी सांगितला आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी मोठी मदत केली आहे. पण त्या मदतीचे कसे पांग त्यांनी फेडले हे आपण पाहिले आहे. पवारांचा देशाचे कृषीमंत्री म्हणून असलेला अनुभव आणि संरक्षण मंत्री म्हणून केलेले काम आणि आजही आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचा अभ्यास आणि संबंध याचा उपयोग शेवटी केंद्रातील लोकांना करून घ्यावा लागतो. पण राजकारणात चिखलफेक करणाऱ्या व्यक्तींना याचा विसर पडतो, असा टोला राऊतांनी भाजपला लगावला.
मतचोरी,घोटाळा,पैशातून महायुतीचा विजय
मुंबईसह महाराष्ट्र ढवळून काढणार आहोत. महाराष्ट्र विचारानं आणि संघटनात्मक बांधणीच्या माध्यमातून पुढे जाणार आहोत. मोर्चा विराट होणार आहे. महापालिकाच्या निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम सुरू आहे. निवडणुकीतील भ्रष्टाचाराविरोधात शिवसेनेचा उपशाखाप्रमुखांचा मेळावा 27 ऑक्टोबर रोजी मुंबईत होणार असल्याचे राऊत म्हणाले. महायुतीला कोणी नेते आहेत का? असा सवाल त्यांनी केला. मतचोरी, घोटाळा आणि पैशाच्या माध्यमातून महायुतीचा विजय झाल्याचा आरोप त्यांनी केला.