वहिनी साहेबांच्या भावना समजू शकतो, दिल्लीत जाण्याची मानसिकता… संजय राऊत यांचा टोला

संजय राऊत यांनी अमृता फडणवीस यांच्या विधानावर टोला लगावला, की देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाण्याची मानसिकता ठेवावी कारण तिथे त्यांना मोठा बंगला मिळेल. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या 'राजकीय विजय' दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, राऊतांनी हा न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले. निवडणूक आयोगावरही त्यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण विकल्याचा गंभीर आरोप केला.

वहिनी साहेबांच्या भावना समजू शकतो, दिल्लीत जाण्याची मानसिकता... संजय राऊत यांचा टोला
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 19, 2026 | 11:07 AM

वहिनी साहेबांची भावना समजू शकतो. पण त्यांनी आता दिल्लीत जाण्याची हळूहळू मानासिकता केली पाहिजे. तिथे इथल्यापेक्षा मोठा बंगला मिळेल, असा टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लगावला आहे. अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुठेच जाणार नाहीत. मी त्यांना कुठे जाऊ देणार नाही. ते महाराष्ट्रातच राहतील, असं विधान केलं होतं. त्यावर राऊत यांनी हा टोला लगावला आहे.

संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांना अमृता फडणवीस यांच्या देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाण्याबाबतच्या विधानाबाबत विचारलं. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सेवक आहेत आणि महाराष्ट्रातच ते राहतील, असं अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या. त्यावर राऊत यांनी टोले लगावले आहेत. आम्ही कुठे म्हणतोय ते महाराष्ट्राचे सेवक नाहीत? ते महाराष्ट्राचे महान सेवक आहेत. वेगळा विदर्भ होत नाही, तोपर्यंत मी लग्न करणार नाही, असं हे महान सेवक म्हणाले होते. काय झाले? मी वहिनीसाहेबांच्या भावना समजू शकतो. भाजप आणि संघासाठी राष्ट्र प्रथम आहे ना? मग त्यांना जावं लागेल. यशवंतराव चव्हाण सुद्धा देशासाठी धावून गेले होते. इथल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जावं लागेल. मोठा बंगला मिळेल. त्यामुळे वहिनीसाहेबांनी हळूहळू मानसिकता तयार केली पाहिजे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

राजकीय विजय म्हणजे काय?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोर्टातील शिवसेनच्या सुनावणीवरून आपल्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन केलं होतं. आपलाच राजकीय विजय होईल, असं शिंदे म्हणाले होते. शिंदे यांच्या या विधानाचाही राऊत यांनी समाचार घेतला. राजकीय विजय म्हणजे काय असतं? राजकीय विजय या शब्दाचा अर्थ मला सांगितला तर बरं होईल. मिंधे म्हणतात न्यायालयात राजकीय विजय होईल. फडणवीस म्हणतात, सर्वोच्च न्यायालयातही तोच निकाल लागेल. नरेंद्र मोदी त्या गद्दारांना भेटल्यावर म्हणतात, घाबरू नका मी तुमच्या पाठिशी. या तिन्ही स्टेटमेंटमधून एकच अर्थ निघतो. त्यांचा डाव सर्वोच्च न्यायालयावर दबाव टाकण्याचा आहे. कायदेशीर दृष्ट्या ते हरले आहेत. संविधानाचा विजय होईल. एकनाथ शिंदेंना आम्ही राजकीय महत्त्व देत नाही. संविधानाचा आणि कायदाचा विजय होईल, असं राऊत म्हणाले.

ते काय रामशास्त्री आहेत का?

आज शिंदे गटाचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद होणार आहे. यावेळी पक्षप्रमुखपदावरच आक्षेप घेतला जाऊ शकतो, याकडे राऊत यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावरही राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांचा युक्तिवाद म्हणजे काय? ते काय रामशास्त्री आहेत का? खोट्याचं खरंच करणार ना. आता यापैकी जे युक्तिवाद करणारे आहेत, त्यांच्या कुणाच्या घरातून 200 कोटीच्या नोट्या ईडीला सापडल्या? हे युक्तिवाद करणारे लोक आहेत. त्यांच्या दिल्लीच्या फॉर्महाऊसमधून 200 कोटीच्या नोटा जप्त केल्या आहेत हे तपासा, असं त्यांनी म्हटलंय.

त्यांनी दलालीचं काम केलं

निवडणूक आयोगाने तेव्हा आमची शिवसेना आणि धनुष्यबाण विकला. हजारो कोटींचा व्यवहार झाला. यात अमित शाह यांनी दलालीचं काम केलं. मी जे बोलतोय तसंच दाखवा. मी परिणाम भोगायला तयार आहे. संविधानाचा इतका कोणी खून करु शकत नाही. मोठं अमिष मिळाल्यावरच हे असं घडतं, अशी टीका त्यांनी केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us