
Sanjay Raut on Ujjawal Nikam: मुंबई हल्ल्यातअजमल कसाब हा जिवंत पकडण्यात आलेला एकमेव दहशतवादी होता. त्याचा खटला त्याकाळी फार गाजला. कसाबचे हसणे, त्याची स्टाईल, तो काय खातो, त्याला बिर्याणी आवडते अशा अनेक कथानकासोबत माध्यमांनी केलेले वार्तांकन वादग्रस्त ठरले होते. त्यावर भारतीय समाजाने टीकेची झोड उठवली होती. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली. अजमल कसाब हा पुढे फासावर लटकला. पण ॲड. निकम यांना कसाबच्या बिर्याणीमुळेच खासदारकी मिळाली असा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. नरकातला स्वर्ग या पुस्तकात त्यांनी मोठा आरोप केला आहे.
कसाबच्या बिर्याणीमुळे खासदारकी
कसाबच्या बिर्याणीने ॲड.उज्ज्वल निकम यांना खासदार केले असा खळबळजनक दावा राऊतांनी Unlikely Paradise, नरकातला स्वर्ग या पुस्तकातून केला आहे. त्यांच्या या पुस्तकात त्यांनी अजूनही काही खळबळजनक दावे केले आहे. या पुस्तकात ॲड. निकम यांना खासदारकी कशामुळे मिळाली यावरून त्यांनी जोरदार टोला लगावला आहे.
“आर्थर रोडच्या जेलमध्ये जेलरसाहेबांच्या, अधिकाऱ्यांच्या मानेवरही कसाबचे भूत होते. कसाबच्या सुरक्षेसाठी गृहखात्याने इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांचे पथक नेमले होते. या पथकाच्या लष्करांप्रमाणेच कारवाया असतात. भारत सरकारने कसाबसाठी आयटीबीपी फोर्सची व्यवस्था केली. कसाबवर लक्ष ठेवण्यासाठी ब्रिटिशकालीन जेल मॅन्युअल जेलर होतेच. जेलमध्येच अनेकांना कसाब कथा सांगण्याचा शौक होता. आम्ही कसाबला कसा तुडवत होतो, हे अनेकदा सांगितले गेले. कसाबला आम्ही संधी मिळेल तेव्हा ठोकला. पण त्याच्यात रग होती,असे सुरक्षा रक्षकांनी अनेकदा सांगितले. महाराष्ट्रात तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार होते. निकमांच्या विधानामुळे भाजपला, तथाकथित हिंदुत्ववाद्यांना हत्यार मिळाले. कसाबच्या बिर्याणीवरून भाजपचे प्रवक्ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बराच काळ झोडपत राहिले. काँग्रेस, राष्ट्रवादीची पुरती बदनामी करण्याची संधी निकमांच्या वक्तव्यामुळे भाजपला मिळाली. निकम यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून भाजपने दोनदा बार उडवले. ते फुसके निघाले.” असा दावा राऊतांनी केला.
त्यातून उज्ज्वल निकम यांना काय मिळाले?
या सर्व घाडमोडींमुळे भाजपला आयतं कोलीत मिळालं आणि त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झोडपून काढलं. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत निकम यांना भाजपची उमेदवारी मिळाली. निकम निवडणूक हरले. पुढे कधीतरी याच निकमांनी मान्य केले की, कसाबला बिर्याणी खाऊ घालणारे विधानं मी जाणूनबुजून केली होती, तसे घडलेच नव्हते. असा निशाणा राऊतांनी उज्ज्वल निकम यांच्यावर साधला. सध्या उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती कोट्यातून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना राज्यसभेत काम करण्याची संधी मिळाली आहे.