Uddhav Thackeray: राज्यसभेच्या जागेवरून खडाजंगी? प्रियंका चतुर्वेदी संतापल्या का? उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीत घडलं काय?
Uddhav Thackeray Shivsena MP Meeting: 'ऑपरेशन टायगर' होण्याच्या चर्चेनंतर उद्धव ठाकरे शिवसेनेच्या खासदारांची काल बैठक झाली. या बैठकीत राज्यसभेच्या जागेवरून चांगलीच खडाजंगी झाल्याचे कळते. प्रियंका चतुर्वेदी यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. तर आदित्य ठाकरे हे सुद्धा खासदारांच्या त्या मागणीवर नाराज झाल्याचे कळते.

Uddhav Thackeray Shivsena MP Meeting:‘ऑपेरशन टायगर’ राबवले जाणार असल्याच्या चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांची बैठक घेतली. काल झालेल्या या बैठकीत राज्यसभेची हक्काची जागा हातून गेल्यावरून खडाजंगी झाल्याचे समजते. नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी याप्रकरणी संताप व्यक्त केला. शरद पवार यांना पाठिंबा दिल्याने राज्यसभेतील शिवसेनेची हक्काची जाग गेली असा सूर आळवल्या गेला. तर इतर खासदारांनी केलेल्या त्या मागणीमुळे आदित्य ठाकरेही नाराज झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्रियंका चतुर्वेदी संतापल्या
उद्धव ठाकरे यांनी काल खासदारांची बैठक बोलावली होती. त्यात उद्धव सेनेच्या खासदारांनी हजेरी लावली. या बैठकीची इनसाईड स्टोरी समोर आली आहे. या बैठकीत शरद पवार यांच्यासाठी शिवसेनेची हक्काची खासदारकीची जागा सुटल्याने प्रियंका चतुर्वेदी संतापल्याचे समजते. संजय राऊतांनी पवारांचं नाव का घेतलं? असा सवाल चतुर्वेदींनी उपस्थित केल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यसभेच्या जागेसाठी उद्धव ठाकरे यांनी खर्गे आणि रमेश चेन्नीथला यांना फोन केल्याचे समजते. आमच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका. काँग्रेसने शरद पवार यांच्याशी थेट बोलावे असे कान त्यांनी टोचले. तर पक्ष प्रमुख मी आहे. राऊत काही बोलले तरी शेवटी निर्णय मीच घेणार होतो असे उद्धव ठाकरे यांनी सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर बैठकीनंतर एका खासदारानं चतुर्वेदींना 6 वर्षे संधी देऊन काय उपयोग झाला असा सवालही उद्धव ठाकरेंना केल्याचे समजते.
खासदारांवर व्यक्त केला विश्वास
तर ऑपरेसन टायगरच्या चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी खासदारांवर विश्वास व्यक्त केला. भाजप आणि राष्ट्रवादीचे लोक सांगतात की तुमचे खासदार फुटणार आहेत. पण माझा तुमच्यावर विश्वास आहे. सर्व लढाई तुमच्या भरवशावर आहे असे उद्धव ठाकरे म्हणाल्याचे कळते. या बैठकीला आदित्य ठाकरे हे पण उपस्थित होते. त्यांनी खासदारांशी संवाद साधला नसल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. आदित्य ठाकरे यांनी मुंबई बाहेर महाराष्ट्रातही दौरे करावेत अशी मागणी काही खासदारांनी केल्याने ते नाराज झाल्याची चर्चा आहे.
