Uddhav Thackeray:… तर महाविकास आघाडीची मतं फुटणार? उद्धव ठाकरे यांच्या मनात काय? विधानपरिषद बिनविरोध? पडद्याआड घडामोडींना वेग
Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेचा डाव चांगलाच रंगण्याची चिन्हं आहेत. उद्धव ठाकरे आणि त्यानंतर काँग्रेस यांची खेळी आणि भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या दोघांच्या भूमिकेनंतर महायुती खेला करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Uddhav Thackeray-Congress-NCP: विधान परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता या निवडणुकीत महायुतीचं स्पष्टपणे वर्चस्व दिसत आहे. उद्धव ठाकरे, काँग्रेसच्या भूमिकेनंतर महायुती मोठा खेला करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. संख्याबळ पाहता महायुती अजून महाविकस आघाडीच्या पारड्यातील जागा खेचून आणण्याची शक्यता आहे. तर उद्धव ठाकरे हे मैदानात उतरल्यास विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होईल. पण उद्धव ठाकरे यांनी नकार दिल्यास महायुती डाव टाकेल.
9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या 12 मे रोजी मतदान होणार आहे. विधान परिषदेच्या एकूण 78 जागांपैकी 30 सदस्य हे विधानसभा सदस्यांमार्फत निवडले जातात. कोट्यातील 9 सदस्यांचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे ही निवडणूक होत आहे. विधानसभेत महायुतीचे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या जागांवर महायुतीचे वर्चस्व असेल. तर उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध
उद्धव ठाकरे उमेदवार असल्यास विधान परिषद बिनविरोध होण्याची शक्यता आहे. महायुती अतिरिक्त उमेदवार देणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. तर स्वतः निवडणूक न लढण्याची उद्धव ठाकरेंची सध्याची भूमिका असल्याचे समोर येत आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे. तर ठाकरे सेनेत अंबादास दानवे, सुषमा अंधारे, विनायक राऊतांच्या नावाची चर्चा होत आहे.
तर महाविकास आघाडीची मतं फुटणार?
जर उद्धव ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात नसेल तर महायुती अतिरिक्त उमेदवार देण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. त्यात विधान परिषदेची निवडणूक झाल्यास महाविकास आघाडीतील मतं फुटण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. अतिरिक्त मतांच्या बिदागीवर महायुतीचा उमेदवार निवडून येऊ शकतो, असा दावा करण्यात येत आहे. एका महिन्यानंतर याची माहिती समोर येईल.
विधान परिषद निवडणूक कार्यक्रम
निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, 23 एप्रिल 2026 रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होईल. इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत असेल. 2 मे पर्यंत अर्जाची छाननी होईल. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 मे रोजी आहे. 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे.