Bachchu Kadu: लढवय्या नेता…आक्रमक नेतृत्व…जनतेतूनही पाठिंबा, तरीही बच्चू कडूंना का हवी शिंदे सेना? शिवसेनेत जाण्यामागे कोणता तो ‘गोडवा’?
Bacchu Kadu Eknath Shinde Shivsena: बच्चू कडू हे शिवसेनेत दाखल होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. प्रहार जनशक्ती पक्ष शिंदे सेनेत विलीन करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. सेना आणि कडू यांना एकमेकांची गरज आताच का भासली याची मोठी चर्चा सुरू आहे.

Bacchu Kadu Eknath Shinde Shivsena: बच्चू कडू हे लढवय्ये नेते म्हणून ओळखले जातात. प्रहार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आक्रमक आंदोलनं केली आहेत. शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग बांधव यांच्यासाठी त्यांनी सरकारविरोधात दंड थोपाटलेले ही आपण पाहिले आहेत. विधान परिषद निवडणुकीची अर्ज भरण्याची तारीख जवळ येताच मात्र घडामोडींना वेग आला. बच्चू कडू हे शिवसेनेत प्रवेश करणार अशा बातम्या आल्या. स्वतःचा पक्ष, संघटना असताना कडू हे शिवसेनेत कोणत्या कारणासाठी जात आहेत याची चर्चा रंगली आहे. या पक्ष प्रवेशातून जसा शिंदे सेनेला विदर्भात मोठा फायदा होईल. तसेच बच्चू कडू यांना सुद्धा मोठी मदत होणार आहे.
राजकीय पुनर्वसन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर बच्चू कडू यांनी त्यांना पाठिंबा दिला. ते गुवाहाटीला पोहचले. त्यानंतर देशातील पहिले दिव्यांग मंत्रालय त्यांच्या माध्यमातून स्थापन झाले. पण त्यापूर्वी विधानसभा निवडणूकीत अचलपूर मतदारसंघात कडूंना पराभवाचा सामना करावा लागला. सरकारसोबतची नाराजी वाढली. त्यांनी सरकारशी फारकत घेतली. शेतकरी, शेत मजूरांना कर्जमाफी देण्यासाठी त्यांनी पदयात्रा सुरू केली. नागपूरमध्ये मोठे आंदोलन झाले. सरकारने वाटाघाटी केल्या. पण तरीही राजकीय ताकद आणि सत्तेचा पाठिंबा आता गरजेचा आहे. विदर्भात राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी कडूंना हे पाऊल टाकावं लागत असल्याचं मानलं जातं आहे.
विधान परिषदेवर वर्णी
या सर्व वाटाघाटीत बच्चू कडू यांना विधान परिषदेची आमदारकी मिळणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात एक खमका आणि लढाऊ नेता सेनेत दाखल होत आहे. शिवसेना हा आक्रमक पक्ष म्हणून ओळखला जातो. अनेक स्थानिक प्रश्नांना थेट भिडल्याशिवाय होत नाही. कडू हे मुळातच शिवसैनिक आहे. कडू हे पुन्हा सेनेत दाखल होत आहे. विदर्भात यामुळे शिवसेनेचा झंझावात दिसून येईल. विधान परिषदेवर वर्णी लागल्यावर त्याचा फायदा अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी होईल.
विदर्भात सेनेसह प्रहारला बळकटी
बच्चू कडू यांना खऱ्या अर्थाने प्लॅटफॉर्म मिळणार आहे. संघटना चालवणे हे फार कठीण आहे. आंदोलन करूनही हाती फार काही लागत नसल्याचे संकेत बच्चू कडू यांनी यापूर्वीही दिले आणि आताही दिले. त्यामुळे सत्तेची साथ असल्याशिवाय राजकीय पुनर्वसन होणार नाही हे कडू यांना कळून चुकले. प्रहार संघटना कायम राहणार आहे. त्यामुळे विदर्भात सेनेसह प्रहारला मोठी बळकटी मिळणार आहे. भाजप आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांना या नवीन घडामोडींमुळे विदर्भात मोठे आव्हान निर्माण होणार आहे. सेनेला विदर्भात या घडामोडीचा मोठा फायदा होईल. लढाऊपणा हे कडूंचं वैशिष्ट्ये आहे. त्यामुळे त्याचा फायदा सेनेला होणार आहे.
