Tailik Gaurav Award : Tv 9 चे विदर्भ ब्युरो चीफ गजानन उमाटेंना पुरस्कार, उत्कृष्ट टीव्ही पत्रकारितेसाठी ‘तैलीक गौरव पुरस्कारा’ने गौरव
विदर्भात टीव्ही माध्यमाला गती देण्याच काम गजानन उमाटे यांनी केलंय. अनेक मोठ्या राजकीय नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. या सर्व गुणांमुळं त्यांना तैलीक गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय.
नागपूर : Tv 9 चे मराठीचे विदर्भ ब्युरो चीफ गजानन उमाटे यांचा ‘तैलीक गौरव पुरस्कारा’ने सन्मान करण्यात आलाय. खासदार रामदास तडस, आमदार अभिजीत वंजारी यांच्या हस्ते गजानन उमाटे (Gajanan Umate) यांना हा गौरव पुरस्कार देण्यात आलाय. टीव्ही पत्रकारितेत उत्कृष्ट कामगिरीसाठी युवा फाउंडेशन (Youth Foundation) आणि आशा गृपतर्फे (Asha Group) हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आलाय. गजानन उमाटे यांनी गेल्या 15 वर्षांत देशभरातील महत्त्वाच्या घटनांचं रिपोर्टिंग केलंय. नुकतंच महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या राजकीय बंडाचं गुवाहटीतून रिपोर्टिंग केलंय. त्यामुळेच गजानन यांच्या उत्कृष्ट टीव्ही पत्रिकारितेचा ‘तैलीक गौरव पुरस्कारा’ने सन्मान करण्यात आलंय.
15 वर्षांपासून ते टीव्ही माध्यमात कार्यरत
वर्धा जिल्ह्यातील किन्हाळा येथे गजानन उमाटे यांचा जन्म झाला. किन्हाळा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण झाले. धरमपेठ महाविद्यालयातून बी. ए. इंग्रजी लिटरेचरमधून पूर्ण केले. प्रथम श्रेणीत नागपूर विद्यापीठातून बीएमसी उत्तीर्ण केले. पदव्युत्तर शिक्षणासाठी मुंबईतील भवन्स येथे गेले. टेलिव्हीजन मीडियातून पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. तसेच सागर विद्यापीठातून मास्टर इन मास कॉम पूर्ण केलं. गेल्या 15 वर्षांपासून ते टीव्ही माध्यमात कार्यरत आहेत.
विदर्भातील टीव्ही माध्यमाला गती
मुंबईत टीव्ही माध्यमात डेस्क आणि फिल्डवर काम केल्यानंतर ते नागपूरला परत आले. वडील शेतकरी असल्यानं कृषी हा त्यांचा बातम्यांचा आवडता विषय आहे. याशिवाय राजकीय पत्रकारितेत गजानन यांचे मोठे नाव आहे. राज्यातच नव्हे तर देशभरात महत्वाच्या ठिकाणी ते रिपोर्टिंगसाठी जात असतात. टीव्ही 9 मराठीनं त्यांना केरळ, कर्नाटकात रिपोर्टिंगला पाठविलं. केरळमध्ये महापूर आला होता. त्याचं रिपोर्टिंग गजानन उमाटे यांनी केलंय. कर्नाटकमध्ये शरद पवार यांचा कार्यक्रम होता. तिथंही शरद पवार यांची विशेष मुलाखत गजानन यांनी घेतली होती. विदर्भात टीव्ही माध्यमाला गती देण्याच काम गजानन उमाटे यांनी केलंय. अनेक मोठ्या राजकीय नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. या सर्व गुणांमुळं त्यांना तैलीक गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय.