सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला गांभीर्याने घेत नाही, केंद्राने राज्याला निर्देश द्यावेत : नारायण राणे

| Updated on: Nov 22, 2021 | 7:10 PM

13 दिवस उलटून गेले असले तरी राज्य सरकारकडून कोणताही ठोस तोडगा काढला जात नाहीये. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केलीय. तसेच या प्रकरणात केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा असेदेखील राणे यांनी म्हटले आहे. ते सिंधुदुर्गमध्ये बोलत होते.

सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला गांभीर्याने घेत नाही, केंद्राने राज्याला निर्देश द्यावेत : नारायण राणे
narayan rane
Follow us on

सिंधुदुर्ग : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. मागील तेरा दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदान तसेच राज्यभर हे आंदोलन केले जात आहे. 13 दिवस उलटून गेले असले तरी राज्य सरकारकडून कोणताही ठोस तोडगा काढला जात नाहीये. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केलीय. तसेच या प्रकरणात केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा असेदेखील राणे यांनी म्हटले आहे. ते सिंधुदुर्गमध्ये बोलत होते.

मी स्वतः गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलेन

महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत एसटीचा विषय येतो. एसटीचा एवढे दिवस संप सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी जवळपास 40 लोकांनी आत्महत्या केली. त्या सर्वांच्या घरची परिस्थिती भयावह आहे. असं असताना राज्य सरकार हा प्रश्न खेळवतंय या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतंय. त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला हे सरकार गांभीर्याने घेत नाही. केंद्र सरकारने सरळ महाराष्ट्र सरकारला निर्देश द्यावेत. हा प्रश्न त्वरित मिटववा, अन्यथा राज्यपालांकडे आम्ही हे अधिकार देऊ वगैरे आदेश केंद्राने द्यावेत. मी स्वतः गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलेन. यातून मार्ग लवकरच काढावा आणि कर्मचाऱ्यांना वाचवावं एवढ मी सांगेन,” असं नारायण राणे म्हणाले. तसेच राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशीसुद्धा कर्मचाऱ्यांच्या हितासाठी बोलेन, असेदेखील त्यांनी सांगितले.

शरद पवार तोडगा कधीच काढत नाहीत

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना घेऊ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच अनिल परब यांच्यात बैठक झाली. या बैठकीवरदेखील राणे यांनी भाष्य केले. त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. तोडगा निघाला नाही याला म्हणतात शरद पवार. शरद पवार तोडगा कधीच काढत नाहीत. खेळवत ठेवणं त्यांचं काम आहे. ज्यांनी सरकार बनवलं ते शरद पवार सरकारला आदेश देऊ शकत नाहीत का? कर्मचाऱ्यांना ताबडतोब न्याय द्या. निलंबित कर्मचाऱ्यांना कामावर घ्या, हे शरद पवार यांनी बोललं पाहिजे. त्यांनी सरकारला सांगितलं पाहिजे. नुसतं अर्थमंत्र्यांना बाजूला बसवून काय फायदा ? शरद पवार राज्याचा कुठलाच प्रश्न सोडवत नाहीत, असे राणे म्हणाले.

…तर हायकोर्टाला महाराष्ट्र चालवायला द्या

नारायण राणे यांनी एसटीच्या विलनीकरणावर तसेच कर्मचाऱ्यांच्या मागणीच्या मुद्द्यावर अनिल परब यांच्यावरदेखील टीका केलीय. हायकोर्टाची वाट बघत आहात. मग तुम्ही कमी पडला असाल तर हायकोर्टाला महाराष्ट्र चालवायला द्या. हे तुम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीला मांडा. सर्व निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होतात ना ? आता मुख्यमंत्री नाहीत दुसरे कोणी असतील मग सांगा आणि निर्णय घ्या. अनिल परब कोकणचे वाटत नाहीत तर ते केरळचे वाटतात. त्यांना एसटी कर्मचाऱ्यांबद्दल आत्मीयता आहे का? ते कधी माझ्या बाजूच्या गावात येताता का ? ते मुंबईचे उद्धव ठाकरे यांचे कलेक्टर आहेत, असेदेखील राणे म्हणाले.

इतर बातम्या :

‘दंगलीत आरोपी असलेल्या अनिल बोंडेंनी शहाणपणा करु नये’, अशोक चव्हाणांचं जोरदार प्रत्युत्तर

‘सरकारकडून स्पष्ट भूमिका येत नाही तोवर ‘लालपरी’चं चाक फिरणार नाही’, परब-पवारांच्या बैठकीनंतरही पडळकर ठाम