नाशिक बागलाण चिकन सेवनानंतर वृद्धेच्या मृत्यू प्रकरणाचे गुढ वाढले, त्या रात्री नेमके काय घडलं….
नाशिकच्या बागलाण येथील २९ जून रोजी घडलेल्या विषबाधा प्रकरणाचे गुढ वाढले आहे. या प्रकरणात नवीन माहिती उघडकीस आली असल्याने आता पोस्टमार्टेम अंतिम रिपोर्टची वाट पाहिली जात आहे.

नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील आखतवाडे गावात चिकन खाल्ल्यानंतर दही खाल्ल्याने एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. आता या प्रकरणात एक धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या घटनेत उपचारादरम्यान ६८ वर्षीय द्वारकाबाई ह्याळीज यांचा १० दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. तर त्यांचे पती ७८ वर्षीय शांताराम ह्याळीज यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून त्यांचाही आज मालेगाव सामान्य रुग्णालयात निधन झाले आहे. या अन्नपदार्थाचे नमूने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवले असून अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण पुढे येणार आहे.
या प्रकरणात एक वेगळा ट्विस्ट आला असून सदर मयत वृद्ध महिलेचे शव विच्छेदन करण्यात आले. त्या अहवालात एक धक्कादायक बाब उघडकीस आली असून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दिलेल्या माहितीप्रमाणे शव विच्छेदन अहवालात त्या महिलेने जेवणच घेतले नसल्याचे उघडकीस आल्याचे मालेगाव सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोमिन यांनी सांगितले. ज्यावेळेस तिचा मृत्यू झाला त्यावेळेस ती उपाशी पोटी होती अशी माहिती उघडकीस आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागल्याची चर्चा आहे.
मुलगा दीपक बेपत्ता
वृद्ध महिलेच्या शव विच्छेदन अहवालामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून आज वृद्ध इसमाचे देखील शव विच्छेदन करण्यात आले असून या दोघांचे अन्न तपासणीचे नमुने प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहे. त्यांचा अहवाल मात्र अद्यापही प्रलंबित आहे. तेव्हा या दाम्पत्याचा घातपात झाला की त्यांच्या मृत्यूला आणखी दुसरे कारण जबाबदार याची चर्चा आता तालुक्यात सुरू आहे. यात नवीन बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून या वृद्ध दाम्पत्याचा मुलगा दीपक ह्याळीज हा देखील बेपत्ता झाल्याची तक्रार त्याचा भाऊ महेंद्र ह्याळीज याने मालेगाव शहर पोलिस ठाण्यात दिल्याने या प्रकरणाबद्दल आता तर्क वितर्क लढविले जात आहे.
