आश्रमशाळांचीही वाजली घंटा; कोविडमुक्त क्षेत्रात 5 वी ते 12 वीचे वर्ग सुरू
राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रात आश्रमशाळांचे पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. आदिवासी विकास विभागाच्या 4 ऑक्टोबर 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिकः राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रात आश्रमशाळांचे पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी दिली आहे. आदिवासी विकास विभागाच्या 4 ऑक्टोबर 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सर्वच शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरी होते. या काळात वाढते बालविवाह, बालमजुरी यासारख्या सामाजिक प्रश्नांचा विचार करता मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु करणेसंदर्भात आदिवासी विकास मंत्री अॅड. के. सी. पाडवी, आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि आदिवासी विकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी विकास विभागाने शाळा आणि वसतिगृहे सुरू करण्यात येत असल्याचे कळवण्यात आले आहे. आश्रमशाळा या निवासी असल्याने विद्यार्थी शाळेतच राहतात. यामुळे स्थानिक ग्रामपंचायतीचा शाळा सुरू करणे बाबतचा ठराव तसेच पाल्याला शाळेत/ वसतिगृहात पाठवणेपूर्वी पालकांचे संमतीपत्र घेऊन शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. वर्ग, भोजनव्यवस्था , निवासव्यवस्था त्यामुळे योग्य ते शारीरिक अंतर आश्रमशाळेत ठेवले जात आहे. शाळा सुरू करताना ग्रामीण स्तरावर किमान एक महिना आधी कोविड रुग्ण न आढळलेल्या ग्रामपंचायत आणि पालक यांचेशी चर्चा करून त्याप्रमाणे शाळा सुरू करणेसाठी मान्यता देण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांना लस बंधनकारक
शाळा सुरू करण्यापूर्वीच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी किमान लसीकरणाचा पहिला डोस घेतले असणे आवश्यक आहे. यासोबतच संपूर्ण आश्रमशाळेचा तसेच वसतिगृह यांचा परिसर स्वच्छ आणि निर्जंतुक करून गर्दी होणार नाही, या दृष्टीने विविध समित्या गठीत केल्या आहेत. विद्यार्थ्यांची वर्गातील बैठक व्यवस्था तसेच निवासव्यवस्था यांचे योग्य नियोजन करणे, शारीरिक अंतर राखणे याबाबतच्या खुणा आणि चिन्हे आश्रमशाळेत आणि वर्गात लावणे अशा सूचनाही आदिवासी आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांचे समुपदेशन
शाळा आणि वसतिगृहे सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांची स्वच्छता आणि सुरक्षितता ठेवणे, शालेय वेळापत्रक बनवणे, भोजनवेळेचे नियोजन करणे , विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित शारीरिक अंतराचे पालन करणे तसेच संशयित किंवा कोविडबाधित आढळल्यास योग्य ती दक्षता घेणे या बाबत देखील सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच विद्यार्थ्यांच्या समुपदेशनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापक, शिक्षक, अधीक्षिक-अधीक्षिका आणि गृहपाल यांचेवर असणार आहे. तसेच अपर आयुक्त व प्रकल्प अधिकारी यांना स्थानिक परिस्थितीनुसार व जिल्हा प्रशासन यांनी कोविड-१९ च्या अनुषंगाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याबाबत कळविले असल्याचे आदिवासी विकास आयुक्त सोनवणे यांनी सांगितले आहे.
इतर बातम्याः
वीजेच्या तांडवात शेतकरी ठार, माय-लेकीसह पाच जण बेशुद्ध; नाशिक जिल्ह्यात 10 शेळ्यांचाही मृत्यू
व्यापाऱ्यांची शेतकऱ्यांना अमानुष मारहाण; कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मालेगावातली संतापजनक घटना
वीजेच्या तांडवात शेतकरी ठार, माय-लेकीसह पाच जण बेशुद्ध; नाशिक जिल्ह्यात 10 शेळ्यांचाही मृत्यूhttps://t.co/saKX2syC21#Lightningstruck|#Nashikdistrict|#Trimbaktaluka|#farmers|#goats
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 6, 2021
