नवरात्रोत्सवः नाशिक ते कोटमगाव जगदंबा माता मंदिरापर्यंत सायकल रॅली, 9 वर्षांपासून पर्यावरण संवर्धनाचे अथक प्रयत्न

| Updated on: Oct 11, 2021 | 1:16 PM

नवरात्रोत्सवाचे निमित्त साधून सायकलपटूंनी नाशिक ते येवल्यातल्या कोटमगाव माता मंदिरापर्यंत सोमवारी सायकल रॅली काढून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

नवरात्रोत्सवः नाशिक ते कोटमगाव जगदंबा माता मंदिरापर्यंत सायकल रॅली, 9 वर्षांपासून पर्यावरण संवर्धनाचे अथक प्रयत्न
नाशिकमधल्या सायकल पटूंनी नाशिक ते येवला तालुक्यातल्या कोटमगाव जगदंबा माता मंदिरापर्यंत सायकल रॅली काढली.
Follow us on

नाशिकः नवरात्रोत्सवाचे निमित्त साधून सायकलपटूंनी नाशिक ते येवल्यातल्या कोटमगाव माता मंदिरापर्यंत सोमवारी सायकल रॅली काढून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

नवरात्रोत्सवाचे निमित्त साधून अनेक चांगल्या कार्याचा पायंडा पडतो. त्यापैकी एक म्हणजे आज नाशिक जिल्ह्यात येवला ते कोटमगावातल्या जगदंबा मातेपर्यंत सायकलपटूंनी काढलेली रॅली. पर्यावरण संवर्धनाचा वसा घेऊन नाशिक शहरातील 100 पेक्षा जास्त सायकलपटू या राइडमध्ये सहभागी झाले. त्यात 31 महिला होत्या. गेल्या नऊ वर्षांपासून नवरात्रात हे सायकलपटू नाशिक ते येवल्यातल्या कोटमगाव जगदंबा मातेपर्यंत सायकल रॅली काढतात. जास्तीत जास्त सायकल चालवा. झाडे लावा आणि झाडे जगवा, असे आवाहन यावेळी नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनच्या संचालिका नलिनी कड यांनी केले. या रॅलीमध्ये तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत सारेच सहभागी झाले. दरम्यान, नाशिक सायकलिस्टस फाऊंडेशनतर्फे पर्यावरण संवर्धनासाठी, गांधी जयंतीनिमित्त नाशिक ते मुंबई सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीने सायकल चळवळ व्यापक व्हावी म्हणून, NetZeroIndia ही चळवळ भारताचे प्रवेशद्वार गेटवे ऑफ इंडिया येथून सुरू करण्यात आली आहे.

सध्याच्या वातावरणात हरितगृह वायूचे प्रमाण वाढल्याने पृथ्वीचे तापमान वाढत आहे. वातावरणात मोठे बदल घडत आहेत. प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य समजून हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी करावे. त्यादृष्टीने दैनंदिन जीवनात वाहतुकीचे साधन म्हणून सायकलचा वापर किमान आठवड्यातून एकदा तरी करावा. नाही जमल्यास महिन्यातून एकदा तरी करावा. इलेक्ट्रिक बाईकचा वापर करावा. जेणेकरून प्रदूषण कमी होईल व पर्यावरणाची हानी टळेल. #NetZeroIndia या मोहिमेची दखल शासनाने घेतल्यास नक्कीच नागरिक आठवड्यातून एकदा किंवा किमान महिन्यातून एकदा “नो व्हेइकल डे” पाळतील, असे आवाहन नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनने केले आहे.

नवरात्रोत्सवानिमित्त आम्ही नाशिक ते येवला तालुक्यातल्या कोटमगावातल्या जगदंबा मातेपर्यंत सायकल रॅली काढली. गेल्या नऊ वर्षांपासून या रॅलीचे आयोजन करण्यात येते. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आम्ही ही रॅली काढतो. सर्वांनी सायकल चालवून पर्यावरण संवर्धनास हातभार लावावा.
– राजेंद्र वानखेडे, अध्यक्ष, नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशन

आजच्या सायकल रॅलीमध्ये 100 पेक्षा जास्त सायकलपटू सहभागी झाले होते. त्यात 31 महिला होत्या. आम्ही कोटमगाव येथील जगदंबा मातेचे दर्शन घेतले. इतरांनी जास्तीत जास्त सायकल चालवावी, असे आवाहन केले. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने सायकल चालवावी.
– नलिनी कड, संचालिका, नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशन

इतर बातम्याः

मंत्री भुजबळांच्या येवला मतदार संघात महाराष्ट्र बंदकडे व्यापाऱ्यांची पाठ; बाजार पेठेतील दुकाने सताड उघडी

नाशिकमध्ये अजूनही म्युकरमायकोसिसचे 23 रुग्ण; कोरोनाच्या 783 रुग्णांवर उपचार सुरू