Sunetra Pawar : कारण आज अजितदादा आपल्यात नाहीत… सुनेत्रा पवार यांची भावूक पोस्ट, वर्धापन दिनाच्या निमित्ताने आवाहन काय?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २७ व्या वर्धापन दिनानिमित्त सुनेत्रा पवार यांनी खास पोस्ट लिहीली. शिव-शाहू-फुले-आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाणांच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेऊया. या विशेष दिनी, आदरणीय अजित दादांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करताना पक्षाला त्यांच्या अनुपस्थितीची पोकळी जाणवते, असं त्यांनी नमूद केलं, त्यांच्या विचारांना स्मरून, सक्षम आणि प्रगत महाराष्ट्रासाठी नव्या जोमाने काम करण्याचा संकल्प करूया असं आवाहन त्यांनी केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचा आज वर्धापन दिन. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पक्षाचा हा पहिलाच वर्धापन दिन असून सर्वांचेच डोळे दादांच्या आठवणीने भरून आले आहेत. शिवसेना फुटली आणि 2 गट झाले. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाने भाजपची साथ दिली. हा पक्ष महायुतीत सहभागी झाला. त्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन्ही राष्ट्रवादीचे वर्धापन दिन साजरे झाले. मात्र जानेवारी महिन्यात बारामतीजवळ विमान अपघातात अजित पवार यांचे अकस्मात निधन झाले. त्यांच्या जाण्याने अख्ख्या महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला, पवार कुटुंबातील व्यक्तीच्या डोळ्यातील अश्रूंना तर कित्येक दिवस खळ नव्हता.
मात्र दादांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा आज पहिला वर्धापन दिन असून याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याराष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी X वर एक पोस्ट लिहीली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनी, दादांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत, त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार करूया, असं आवाहन त्यांनी या पोस्टद्वारे केलं आहे. प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी नव्या जोमानं काम करण्याचा संकल्प करूया असंही त्यांनी पोस्टमध्ये नमूद केलं.
सुनेत्रा पवार यांची पोस्ट काय ?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्ष परिवारातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि हितचिंतकांना मनःपूर्वक शुभेच्छा!
शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा तसेच स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी घालून दिलेल्या सुसंस्कृत, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख राजकारणाच्या पायावर उभा राहिलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज आपल्या यशस्वी प्रवासाची २७ वर्षे पूर्ण करत आहे. या प्रवासात असंख्य नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेने पक्षाला दिलेली साथ हीच आमची खरी ताकद राहिली आहे, अस त्यांनी लिहीलं.
पण यंदाचा वर्धापन दिन साजरा करताना मनात एक वेगळीच भावना दाटून येते. कारण आज आदरणीय अजित दादा आपल्यात नाहीत…
त्यांनी जपलेला माणूस हा त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू
सभागृहात भाषणं होतील, कार्यकर्त्यांचे मेळावे होतील, पक्षाचा झेंडा तितक्याच अभिमानानं फडकेल, पण प्रत्येक क्षणी एक पोकळी जाणवत राहील. दादा हे फक्त पक्षाचे नेते नव्हते, तर ते आधारवड होते. कार्यकर्त्यांच्या, सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात धावून जाणारे, संकटात खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे, चूक झाली तर कान धरून समजावणारे आणि चांगलं काम केलं तर पाठीवर कौतुकाची थाप देणारे दादा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनले होते. त्यांनी जपलेला माणूस हा त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता, असंही सुनेत्रा पवार यांनी पोस्टमध्ये नमूद केलं.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनी, दादांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत, त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार करूया. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन आणि स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुरोगामी वाटेवर चालून अधिक सक्षम, समृद्ध आणि प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी नव्या जोमानं काम करण्याचा संकल्प करूया, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहीलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्ष परिवारातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि हितचिंतकांना मनःपूर्वक शुभेच्छा!
शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा तसेच स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी घालून दिलेल्या सुसंस्कृत,… pic.twitter.com/znyhzOGB4K
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) June 10, 2026