नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या, अशी मागणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्त मंडळीं आणि नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध दर्शवला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते, आगरी कोळी समाजाचे दैवत स्व. दि. बा. पाटील यांचे नावाचा आग्रह केला जात आहे. या विमानतळाच्या नामांतराच्या वादात मनसेनेही उडी घेतली आहे. (MNS Letter To CM Thackeray on Navi Mumbai International Airport ReNaming controversy)
नुकतंच नवी मुंबईतील सीवूड येथील मध्यवर्ती कार्यालयात मनसेने पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनसेने बाळासाहेब ठाकरे यांचे नाव न देता दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशा आशयाचे पत्र लिहिले आहे. मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबतचे पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देणे का गरजेचे आहे, याचे स्पष्टीकरणही लिहिले आहे.
“ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी केली. मुळात पालकमंत्री म्हणून अशी मागणी करताना नवी मुंबईकरांचा कानोसा घेणे आवश्यक होते, तो त्यांनी घेतला नाही याबद्दल खेद वाटतो.”
“मागील अनेक वर्षांपासून नवी मुंबई करांमधून लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे अशी मागणी जोर धरत आहे. नवी मुंबईतील जमिनी जेव्हा जे एन पी टी , सिडको १९८० च्या दरम्यान ताब्यात घेत घेऊन शेतकऱ्यांना, प्रकल्पग्रस्तांना अत्यंत एकरी केवळ १० ते २० हजार रुपये मोबदला दिला जात होता. स्व. दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली खूप मोठा लढा उभारण्यात आला. १९८४ च्या प्रसिद्ध उरण परिसरातील आंदोलनात ५ जण शहिद झाले. आंदोलनाची तीव्रता बघून सरकारने १८९४ चा ब्रिटिशकालीन अन्यायकारक भूसंपादन कायदा बदलून नवीन कायदा केला आणि भूमिपुत्रांना १२.५% जमीन मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.” (MNS Letter To CM Thackeray on Navi Mumbai International Airport ReNaming controversy)
“लोकनेते दि बा पाटील यांनी आगरी कोळी समाजाला शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक शाळा, महाविद्यालये उभी केली. दि. बा. पाटील विधानसभेत ४ वेळा आमदार, विरोधी पक्षनेता होते. तसेच लोकसभेत दोन वेळा खासदार होते. दोन्ही सभागृहातील त्यांची कामगिरी अत्यंत प्रभावी होती. नवी मुंबईतील भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांच्या त्यागाचे प्रतीक म्हणून नवी मुंबई विमानतळाकडे बघितले जाते. त्यामुळे लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचेच नाव विमानतळासाठी योग्य असल्याचे नवी मुंबईकरांचे मत आहे.”
“मंत्री एकनाथ शिंदे यांची सर्वसामान्यांशी नाळ तुटताना दिसत आहे. विमानतळासाठी आपल्या जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांचे पुनर्वसनाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. जमिनी संपादन करताना दिलेली आश्वासने सिडको पाळत नाही. या प्रश्नांवर न बोलता नगरविकास मंत्री नामकरणाच्या विषयात एकनाथ शिंदे का लक्ष घालत आहेत, याचा जाब आपण मंत्रीमहोदयांना विचारणे आवश्यक आहे. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली नाळ भांड्वलदारांशी जुळवून घेतली नाही ना, असा प्रश्न नवी मुंबईकरांना पडत आहे.”
महाराष्ट्रातील एखादया भव्य प्रकल्पाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे.
परंतु लाेकभावना लक्षात घेता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते,आगरी काेळी समाजाचे दैवत स्व. दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे…. नवी मुंबई मनसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.@mnsadhikrut pic.twitter.com/ICeKCQ40VP
— Gajanan Kale MNS (@GajananKaleMNS) January 2, 2021
“मागील अनेक वर्षांपासून लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे, हि मागणी जोर धरत असताना पालकमंत्री एकनाथ शिंदे अचानक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची मागणी करून जे राजकारण करत आहेत, ते निंदनीय आहे. लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे, हि मागणी अनेक संघटनांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री, नागरी उड्डाण मंत्री यांना पत्र देऊन केली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे समस्त मराठी जणांचे मानबिंदू आहेत. त्यांचे भव्य स्मारक व्हावे अशी समस्त मराठी जणांची अपेक्षा आहे. परंतु मागील सहा वर्षात शिवसेना राज्यात सत्तेत असूनही स्व. बाळासाहेबांचे स्मारक बनवू शकली नाही, हि दुर्दैवाची बाब आहे. अशा वेळी स्मारकाचे काम लवकर कसे होईल इकडे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष देणे जरुरी आहे. त्याचप्रमाणे येत्या काळात महाराष्ट्रात होणारा एखादा भव्य प्रकल्प असेल त्याला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे आणि स्व. बाळासाहेबांचा यथोचित गौरव करावा.”
“नवी मुंबई विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देऊन आणि भविष्यात महाराष्ट्रातील एखाद्या मोठ्या, भव्य प्रकल्पाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देऊन, तसेच स्व. बाळासाहेबांचे स्मारक लवकर पूर्ण करून दोन्ही महापुरुषांचा योग्य सन्मान राखला जाईल. तशी आपण कार्यवाही करावी हि विनंती.”
“तरी आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नवी मुंबईच्या मागणीचा सकारात्मक विचार कराल हि अपेक्षा,” असे पत्र मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी लिहिले आहे. (MNS Letter To CM Thackeray on Navi Mumbai International Airport ReNaming controversy)
संबंधित बातम्या :
“नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या”