नवी मुंबईतील 2 लाख 37 हजार जण लोकल प्रवासासाठी पात्र, दुसऱ्या डोससाठी नागरिकांची धावाधाव

राज्य सरकारने कोव्हिडचे दोन डोस घेतलेल्यांना येत्या 15 ऑगस्टपासून लोकल रेल्वेच्या प्रवासाची मुभा दिली आहे. त्यानुसार नवी मुंबई शहरातील तब्बल 2 लाख 37 हजार 513 जणांनी कोव्हिडच्या लसीचा दुसरा डोस घेतल्याने पात्र ठरणार आहेत.

नवी मुंबईतील 2 लाख 37 हजार जण लोकल प्रवासासाठी पात्र, दुसऱ्या डोससाठी नागरिकांची धावाधाव
सांकेतिक फोटो
Reporter Harshal Bhadane Patil | Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Aug 10, 2021 | 9:49 AM

नवी मुंबई : राज्य सरकारने कोव्हिडचे दोन डोस घेतलेल्यांना येत्या 15 ऑगस्टपासून लोकल रेल्वेच्या प्रवासाची मुभा दिली आहे. त्यानुसार नवी मुंबई शहरातील तब्बल 2 लाख 37 हजार 513 जणांनी कोव्हिडच्या लसीचा दुसरा डोस घेतल्याने पात्र ठरणार आहेत.

 

पहिला डोस घेतल्यानंतर आवश्यक कालावधी उलटूनही अनेकांनी दुसरा डोस अजून घेतलेला नाही; तर काहींनी दुसरा डोस घेण्यासाठी टाळाटाळ केली; मात्र दोन्ही डोस घेतल्याशिवाय रेल्वे प्रवास शक्य नसल्याने अशा लाभार्थींनी आता दुसरा डोस घेण्यासाठी धावाधाव सुरु केली आहे. मात्र, लसींचा पर्याप्त साठा उपलब्ध होत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत.

नवी मुंबईत 9 लाख 39 हजार 452 जणांचं लसीकरण

महापालिकेने आतापर्यंत तब्बल 9 लाख 39 हजार 452 लोकांना लशींचा डोस दिला आहे. त्यापैकी 7 लाख एक हजार 939 लोकांनी पहिला डोस घेतला आहे. नागरिकांना त्यांच्या घरापासून जवळच लस घेणे सुविधाजनक व्हावे याकरिता महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार सद्यःस्थितीत 91 लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत.

तिसऱ्या लाटेपूर्वी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचा नवी मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न

तसेच, यापुढील काळात अधिक प्रमाणात लस उपलब्ध झाल्यास कोव्हिड लसीकरणाला वेग देण्यासाठी शंभरहून अधिक लसीकरण केंद्रे सुरु करण्याचे संपूर्ण नियोजन करण्यात आलेले आहे. कोव्हिडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे याकरिता नवी मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील असून ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतलेला आहे त्यांना विहित कालावधीत दुसरा डोस उपलब्ध करुन देण्याची काळजी घेतली जात आहे.

मुख्यमंत्र्यांकडून सामान्यांसाठी लोकल प्रवासाची घोषणा

दोन डोस घेतलेल्या नागरिकांना आता 15 ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येणार आहे, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलीये. स्वातंत्र्य दिनापासून लोकल सुरु होणार आहे. पहिल्या टप्प्यात ज्यांनी दोन डोस घेतलेत आणि डोस घेतल्यानंतर ज्यांना 14 दिवस झाले आहेत त्यांना प्रवासाची परवागनी देण्यात आली आहे. लोकल पाससाठी अॅपवर अर्ज करावा लागणार आहे. यासाठी ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी मोबाईल अॅपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करु शकतील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील.

संबंधित बातम्या :

लोकल ट्रेन प्रवासासाठी अ‍ॅप दोन दिवसांत सुरु होणार, 65 टक्के स्थानकांवर क्युआर कोड

राज्य सरकारकडून लोकलचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे, विजय वडेट्टीवारांची माहिती, 15 ऑगस्टपासून सामान्यांसाठी लोकल सुरु!

Follow Us