Sharad Pawar : शरद पवार यांच्याकडून दिल्लीत भर बैठकीत नाराजी व्यक्त, नेमकं प्रकरण काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या कामकाजाबद्दल दिल्लीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
नवी दिल्ली : देशाती राजधानी दिल्लीत (Delhi) आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या सर्वपक्षीय बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राजकीय हेतून काम करतात, असा आरोप शरद पवारांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. राज्यपालांच्या भूमिकेबद्दल सभागृहात चर्चा होणं गरजेचं आहे, असंही शरद पवार म्हणाले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवारांनी आज राज्यपालांच्या कामकाजाबाबत सर्वपक्षीय बैठकीत नाराजी व्यक्त केली. विरोधी पक्षाचं सरकार असलेल्या राज्यात राज्यपालांचा हस्तक्षेप वाढला आहे. राजकीय हेतूने राज्यपाल काम करतायेत. या संदर्भात सभागृहात चर्चा होणं गरजेचं आहे, असं मत शरद पवारांनी बैठकीत मांडलंय.
महाराष्ट्रातील राज्यपालांच्या कामकाजावरून शरद पवारांनी आज दिल्लीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मुद्दा मांडला असल्याची शक्यता आहे. राज्यपालांच्या विषयावर चर्चा करा, असा मुद्दा शरद पवारांनी आज सर्वपक्षीय बैठकीत मांडल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय.
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला शरद पवार हे देखील उपस्थित होते. याच बैठकीत शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कामकाजावरुन नाराजी व्यक्त केली. शरद पवार यांच्या या नाराजीची दखल घेऊन भाजप काही ठोस भूमिका मांडते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
मुंबईतही सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय नेत्यांचे खलबतं
विशेष म्हणजे इकडे महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतही सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बैठक आयोजित केली होती. येत्या 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावल्याची माहिती समोर आलीय.
या बैठकीत राज्याचे केंद्राकडे प्रलंबित असलेल्या विषयांची माहिती खासदारांना देण्यात आली. अर्थसंकल्प अधिवेशनात खासदारांना ते विषय मांडता यावेत यासाठी ही बैठक बोलावली होती.
सर्वपक्षीय बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह आणखी काही नेते मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर उपस्थित होते. या बैठकीला ठाकरे गट आणि महाविकास आघाडीच्या खासदारांनी बहिष्कार टाकलेलं बघायला मिळालं. पण तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे या बैठकीत हजर होते. विशेष म्हणजे ते पक्षाच्या बैठकीला उरस्थित नव्हते. पण सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.