ठाकरे-फडणवीसांचा एकाच विमानाने प्रवास, हा योगायोग; रोहित पवार थेट बोलले
Rohit pawar : रोहित पवार यांनी ठाकरे-फडणवीसांच्या एकत्र प्रवासावर भाष्य केलं. दोघांचा एकत्र प्रवास योगायोग असल्याचे म्हटल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल एकाच विमानातून प्रवास केला. दोघेही नेते नागपूरला निघाले होते. मुख्यमंत्र्यांचा नागूपरला नियोजित दौरा होता. तर उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा निश्चित केला आहे. दोन्ही नेत्यांनी विदर्भाचा दौरा एकाच विमानातून केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. अनेक नेते नव्या राजकीय समीकरणाची चर्चा करू लागले होते. तर दोन्ही नेत्यांच्या एकत्र विमान प्रवासावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे-फडणवीसांचा एकाच विमानाने प्रवास, हा योगायोग असल्याचे रोहित पवार म्हणाले.
खासदारांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे रोहित पवार हे राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधत आहे. मराठवाड्यातील दौऱ्यादरम्यान राज्यातील घडामोडींवर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले, आम्ही कुठे विमानाने प्रवास केला, त्या विमानात मुख्यमंत्री फडणवीस असतील. त्यावेळी सहज जाऊन भेटत असतो. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या भेटीचा योगायोग आहे, असं म्हणता येईल. दोन नेते एकाच विमानात असतील, तर हरकत काय आहे? सर्वच नेते एका विमानाने प्रवास करत असतील, तर पेट्रोल देखील वाचेल, असं आपल्याला म्हणता येईल. एकाच दिशेने बडे नेते प्रवास करत असतील, तर लोकांमध्ये चर्चा होणारच’.
‘आपले घर, कार्यकर्ते आमदार, खासदार हे भाजपसारखा पक्ष फोडत असेल. तर स्वाभिमानाला धक्का बसत असतो. उद्धव ठाकरे हे स्वाभिमानी नेते आहेत. ते बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत. स्वाभिमानी माणूस, व्यक्ती भाजपसोबत जाऊन तडजोड करण्याची चर्चा लोकांमध्ये असेल, तर ती खोटी, निराधार आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले.
ठाकरेंच्या दौऱ्यावर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले, ‘ शेवटी तिथे असलेल्या कार्यकर्त्यांना जाऊन भेटणं तितकाच महत्त्वाचं आहे. त्या सहा खासदारांना निवडून आणण्यात उद्धव ठाकरे यांचा मोठा वाटा होता. त्यांना पवार साहेबांनी खंबीरपणे साथ दिली. तिथं जर हे सहा लोक गद्दारी करत असतील, तर ते कोणालाही आवडलं नाही. काल उद्धव ठाकरे नागपूरला पोहोचले, तेव्हा हजारो लोक तिथे आले होते. या सहा खासदारांचा निर्णय लोकांना आवडला नाही. आम्ही शेतकऱ्यांसाठी लढत आहोत. शेतकऱ्यांसाठी 19 तारखेला खूप मोठा आंदोलन केंब्रिज चौकामध्ये करणार आहोत.’
रोहित पवारांचा सत्ताधारी पक्षाचे खासदार फुटणार असल्याचा दावा
फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले, मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला आणखी ४१ खासदारांची गरज आहे. यात तृणमूल काँग्रेस, ठाकरेंचे खासदार मोजले आहेत. भाजपला आणखी खासदार फोडायचे आहेत. आताच्या घडीला खासदारांना किंमत आहे. परंतु मतदारसंघ पुनर्रचना विधेयक होणे शक्य नाही. परंतु चुकून झाल्यास सर्व खासदारांची किंमत शून्य होऊन जाईल. एकीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी ‘एकला चलो रे’ नारा दिलाय. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारांचा पक्ष आहे. ‘एकला चलो रे’चा नारा असेल, तर २०२९ च्या निवडणुकीआधी या दोन्ही सत्ताधारी पक्षाचे खासदार फुटून भाजपमध्ये जातील. भाजपचं एकनाथ शिंदे यांच्यावरील प्रेम हे मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी आहे. तसेच महाराष्ट्रात सत्ता ठेवण्यासाठी आहे. सर्व वेळ निघून गेल्यानंतर दोन्ही पक्षाचे खासदार हे भारतीय जनता पक्षात फुटून जातील’.
