आईने इच्छा व्यक्त केली, आणि मी ती पूर्ण केली, नितीन गडकरी यांनी सांगितला तो भावनिक अनुभव
सोलापूर येथील कायक्रमात नितीन गडकरी यांनी आपल्या मातोश्रींची एक भावनिक आठवण सांगितली. सोलापूरातील उड्डाण पुलाचे काम माझ्याकडून राहिल्याचेही त्यांनी सांगितले.

माझ्या आईची सोलापूरासंदर्भात एक भावनिक आठवण आहे. तिच्या मृत्यूपूर्वी ती अक्कलकोट गाणगापूराला आली होती. त्यानंतर तिने घरी आल्यावर मला सांगितले की नितीन तुला आयुष्यात कधी संधी मिळाली तर गाणगापूर-अक्कलकोट पंढरपूरचा तेवढा रस्ता नीट कर. आपण त्यानंतर सुशील कुमार शिंदे यांना आमंत्रित केले. सोलापूरमध्ये एकाच दिवशी 52 हजार कोटींच्या रस्त्यांचे भूमिपूजन झाले, एक सोलापूरचा उड्डाण पुल वगळता सर्व कामे आपण पूर्ण केल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सोलापूरात सांगितले.
नितीन गडकरी पुढे म्हणाले की दिल्लीत गेल्यापासून माझे सोलापुरात येणे कमी झाले. मात्र पूर्वी काम करीत असताना वारंवार सोलापुरात येण्याची संधी मिळाली.माझ्या आईच्या इच्छेप्रमाणे मी सोलापूरातील गाणगापूर-अक्कलकोट पंढरपूरचा रस्ता तयार केला. त्यावेळी मी 52 हजार कोटींची रस्त्यांचे भूमीपूजन केले त्यावेळी सुशीलकुमार शिंदे म्हणाले की एवढी मोठी घोषणा केली ही काम होतील का ? त्यावर मी त्यांना म्हणालो हो सगळी पूर्ण होतील. एक काम सोडून सर्व कामे झालीत. सोलापूर शहरातील उड्डाणपूल करू शकलो नाही. त्याला क्लिअरन्स न मिळाल्याने ते काम होऊ शकले नाही. आता त्याची रक्कम दुप्पट झाली आहे.
मात्र, आता प्रणिती शिंदे आणि ज्योती वाघमारे यांनी पुढाकार घ्यावा आणि मला दिल्लीत आठवण करून द्यावी मी ते करून देतो. आता हे काम लवकरच पूर्ण होईल आणि मी दिलेला शब्द लवकरच पूर्ण होईल.मला खोटं बोलायची सवय नाही. मी जे होणार आहे ते सांगतो आणि ते पूर्ण करतो असेही गडकरी यावेळी म्हणाले. पुढील 2029 पर्यत सोलापूर जिल्ह्यात 1 लाख कोटी रुपयांची कामे करून देईन.अहमदनगर-करमाळा -सोलापूर चौपदरीकरणासाठी अकराशे कोटी निवेदन मंजूर केले आहे. जुना पुना नाका ते बोरामणी नाका उड्डाणपूल मंजूर झाला आहे. अहमदनगर ते अक्कलकोट रस्ता लवकरच मंजूर करतोय असेही नितीन गडकरी यावेळी म्हणाले.
मुंबई ते बंगलोर साडेपाच तासात….
सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड मार्ग हा सोलापूर जिल्ह्याचे नशीब बदलवणारा मार्ग आहे असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की हिमाचल प्रदेश प्रमाणे हा रस्ता होणार आहे.सोलापूर जिल्हा हा लॉजिस्टिक हब बनणार आहे. सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड मार्गाने चेन्नई ते दिल्ली अंतर 400 किमी कमी होणार आहे. मुंबई ते बंगलोर नवीन ग्रीन फिल्ड हायवे करणार आहोत. मुंबई- पुणे एक्सप्रेस वे बांधला आता नवीन एक्सप्रेस हायवे बनवणार. हा हायवे झाल्यावर मुंबई ते बंगलोर साडेपाच ते सहा तासात पोहोचणे शक्य होणार असल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले.
टेंभूर्णी ते पंढरपूरचे चौपदरीकरण
सोलापूर रिंग रोडला मी मान्यता देतो आहे. टेंभूर्णी ते पंढरपूर हा रस्ता प्रलंबित होता, त्याचे चौपदरीकरण करणार आहे. – पंढरपूरचा पूर्ण रिंग रोड मंजूर करणार आहोत. आळंदी ते पंढरपूर हा 12 हजार कोटी रुपयांचा पालखी महामार्ग 80 टक्के पूर्ण झाला आहे. तोडले बोन्डले 100 कोटींचा फ्लाय ओव्हर मंजूर केला आहे. अक्कलकोट गाणगापूर हा रस्ता खराब झाला आहे, तो लवकरच चांगला होईल असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.
