Prakash Ambedkar : कोणतीही चूक होऊ देऊ नका, ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन, म्हणाले आपली थेट लढाई….

| Updated on: Apr 17, 2024 | 2:02 PM

Lok Sabha Election 2024 : वंचिताच प्रयोग नेमका कशासाठी, कोणाविरुद्ध लोकसभेच्या मैदानात वंचित उतरली आहे, असे अनेक संभ्रम सर्वसामान्यांनाच नाही तर कार्यकर्त्यांना पण आहेत. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटरवर कार्यकर्त्यांना पत्र लिहले आहे. त्यात त्यांनी खरी लढाई कोणाविरुद्ध हे स्पष्ट केले आहे.

Prakash Ambedkar : कोणतीही चूक होऊ देऊ नका, ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन, म्हणाले आपली थेट लढाई....
प्रकाश आंबेडकर
Follow us on

Prakash Ambedkar : वंचितने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हवा केली आहे. काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे. तर काही मतदारसंघात महाविकास आघाडीच्याविरोधात उमेदवार दिला आहे. त्यांनी महाविकास आघाडीवर खरमरीत टीका सुद्धा केली आहे. त्यामुळे वंचितचा प्रयोग नेमका कुणाविरोधात सुरु आहे. वंचितने कुणाविरोधात दंड थोपाटले आहेत, असा संभ्रम सर्वसामान्यांनाच नाही तर कार्यकर्त्यांना सुद्धा आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटरवर कार्यकर्त्यांना पत्र लिहले आहे. त्यात त्यांनी खरी लढाई कोणाविरुद्ध हे स्पष्ट केले आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.

ॲड. आंबेडकर यांनी पत्रात काय म्हटले ?

हे सुद्धा वाचा

कार्यकर्त्यांच्या बहुमोल पाठिंब्याबद्दल, अतूट निष्ठा आणि पक्षासाठी तुम्ही केलेल्या अखंडीत कामाबद्दल आभार मानण्यासाठी हे पत्र लिहित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपली वाढती शक्ती आणि महाराष्ट्रातील उलटसुलट राजकीय परिस्थितीने आपल्याला एक संधी दिली आहे, ती म्हणजे राज्यस्तरीय पक्ष बनण्याचे आपले स्वप्न साकार करण्याची. हे केवळ आपले स्वप्न नाही; तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते; ते भैय्यासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते. मला माहित आहे की, तुम्ही सर्वजण हे 70 वर्षांचे अपूर्ण स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लढत केवळ भाजपशी

पहिल्या टप्प्यातील मतदारसंघातील निवडणूक लढती फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि भाजपा यांच्यात आहे.आपल्याकडून कोणतीही चूक होऊ देऊ नका. महाराष्ट्रातील ही लढाई फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि भाजपा यांच्यात आहे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

वंचितचा सक्षम पर्याय

शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले आहेत. महाराष्ट्रात भाजप उमेदवार शोधण्यासाठी धडपडत आहे आणि महाराष्ट्रातील जागा वाटपावरून मित्रपक्षांशी संघर्ष करत आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते आणि अनेक वरिष्ठ नेते त्यांच्या प्रदेशाध्यक्षांविरोधात उघडपणे बंड करत आहेत. महाराष्ट्रातील उलटसुलट राजकीय परिस्थिती पाहता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी या लढाईमध्ये संपूर्ण ताकदीने लढण्यास सक्षम आहे. यामुळेच काँग्रेसलाही मतदारांमधील आमची लोकप्रियता कळते आणि म्हणून आम्हाला त्यांच्या दिल्लीत बसलेल्या काँग्रेसच्या हायकमांडने नागपुरातील त्यांच्या उमेदवारासाठी पाठिंबा देण्याची विनंती केल्याचे त्यांनी सांगितले.

वंचितची वाटते भीती

माझी तुम्हाला आणखी एक विनंती आहे की, महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांच्या पगारावर काम करणाऱ्या फेक न्यूज यंत्रणांनी पेरलेल्या खोट्या बातम्या वाचून आणि पाहून तुमचा संयम गमावू नका. त्याचा सत्याने सामना करा आणि तुमचा संयम गमावू नका. खरे तर त्यांना आपल्या पक्षाची आणि वाढत्या लोकप्रियतेची भीती वाटते या गोष्टीचा तुम्हाला आनंद आणि गर्व वाटला पाहिजे. खोट्या बातम्या देऊन आपल्याला बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न आपण किती सामर्थ्यवान झालो आहोत हे दर्शवते. वंचित बहुजन आघाडी त्यांची दुकाने बंद करेल याला ते घाबरत असल्याचे वास्तव आहे, असे ते म्हणाले. त्यांनी मीडियावर पण तोंडसूख घेतले. प्रचारासाठी बाहेर पडाल तेव्हा पुरेशी काळजी घ्या. पाण्याची बाटली आणि सोबत दुपट्टा ठेवा, असा काळजीवाहू सल्ला पण त्यांनी दिला.