Rain Alert: हवामान तज्ञ कैलास डाखोरे यांचा सप्टेंबरच्या पावसाबद्दल धडकी भरवणारा अंदाज, शेतकर्यांसाठी मोठा अलर्ट
Maharashtra weather today Rain Alert: यंदा जुलै महिन्यात पावसाने रेकॉर्डब्रेक बॅटिंग केली. तरीही राज्यातील अनेक भागाला पावसाची प्रतिक्षाच आहे. या पट्ट्यात दमदार पाऊस झालाच नाही. आता परतीच्या पावसापूर्वी सप्टेंबर महिन्यात पावसाची स्थिती कशी असेल याविषयी परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील हवामान शास्त्र विभागातील तज्ञ डॉ.कैलास डाखोरे यांनी मोठा अंदाज वर्तवला आहे.

ज्ञानेश्वर उंडाळ, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांकडे यंदा पावसाने पाठ फिरवली. समाधानकारक पाऊस न झाल्याने पीकं करपली आहेत. तर पिण्याचे पाणी, पशुधन, त्यांचा चारा आणि पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यातील इतर भागातही पावसाने दडी मारल्याने चिंतेचे ढग पसरले आहेत. अनेक भागात दमदार पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. आता परतीच्या पावसापूर्वी सप्टेंबर महिन्यात पाऊस साथ देणार का? या प्रश्नाच्या उत्तरासाठी शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. सप्टेंबर महिन्यात पावसाची स्थिती कशी असेल याविषयी परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील हवामान शास्त्र विभागातील तज्ञ डॉ.कैलास डाखोरे यांनी मोठा अंदाज वर्तवला आहे.
सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस
पावसाच्या आघाडीवर शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. सप्टेंबर महिन्यात यावर्षीच्या सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार असल्याचा हवामान विभागाच्या तज्ज्ञांचा अंदाज आहे. तर पुढील पाच दिवसात मराठवाड्यातील उत्तर आणि पश्चिम भागातील काही ठिकाणी तूरळक पाऊस होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. या महिन्यात पाऊस कमी असल्यामुळे उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. ज्या शेतकर्यांकडे सिंचनाची सोय आहे. त्यांनी आपली पीक वाचवण्यासाठी सूक्ष्म सिंचनाने जमीन ओलीत ठेवावी असा सल्ला परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील हवामान शास्त्र विभागातील तज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी दिला आहे.
राज्यात 3-4 दिवसांत पावसाचा अंदाज
ऑगस्ट महिन्यात पाऊस थांबल्याने चिंतेचे ढग गडद झाले आहेत. पावसाच्या मेगा ब्रेकने मराठवाड्यासह अनेक भागांना मोठा फटका बसला आहे. या पट्ट्यात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आ वासून उभा ठाकला आहे. दुष्काळ निवारण्यासाठी आता प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील 3-4 दिवसात विदर्भ आणि मराठवाड्यासह काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. ओडिशाकडून पश्चिमेकडे सरकणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि दक्षिण गुजरात ते उत्तर मध्य महाराष्ट्रादरम्यान तयार झालेल्या वाऱ्याच्या द्रोणीय रेषेमुळे 2 सप्टेंबरच्या संध्याकाळनुसार महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा जोर दिसू शकतो. हवामान विभागानुसार महाराष्ट्रभर पावसाचा जोर दिसेल. सध्या राज्यातील अनेक भागांना दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. या भागात पावसाने बॅटिंग केल्यास रब्बी हंगामाला फायदा होईल. पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागेल.
