परभणीत सभामंडप कोसळल्याने 6 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं? अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
Parbhani Temple Accident : परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथील हनुमान मंदिरात सभामंडपाचे छत कोसळून भीषण दुर्घटना घडली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक भाविक जखमी झाले आहेत. दुर्घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

परभणीत आज मंदिराचे छत कोसळून झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यशवाडी येथील हनुमान मंदिरात ही घटना घडली आहे. मंदिराच्या गर्भगृहासमोर उभारण्यात येत असलेल्या सभामंडपाचे छत अचानक कोसळल्याने 6 जणांचा मृत्यू होऊन ठिगाऱ्याखाली अनेकजण अडकले असल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या भाविकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
या दुर्घटनेत जखमी झालेल्या भाविकांना उपचारासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनीही मदतकार्यामध्ये सहभाग घेतला आहे. ढिगारा हटवण्यासाठी यंत्रसामग्रीचा वापर केला जात असून जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवण्यासाठी अनेक रुग्णवाहिका घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत. वैद्यकीय पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत.
सीसीटीव्ही व्हिडिओ समोर
हनुमान मंदिरात झालेल्या या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. यात काही भाविक दर्शन घेताना दिसत आहेत. यावेळी अचानक मंडप कोसळतो आणि ढिगाऱ्याखाली अनेक भाविक गाडले जातात. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. सध्या घटनास्थळी मदतकार्य सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
परभणीत सभामंडप कोसळल्याने 6 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं? अंगावर काटा आणणारा VIDEO समोर #parbhani #accident #video #temple pic.twitter.com/ZcE1gMi6jn
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 20, 2026
पालकमंत्र्यांनी घेतली दखल
या भीषण दुर्घटनेची पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी गंभीर दखल घेतली असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून आवश्यक मदतसाहित्य, क्रेन आणि बचाव यंत्रणा तातडीने घटनास्थळी पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर आणि जिल्ह्यातील इतर प्रमुख नेत्यांनीही प्रशासनाशी संपर्क साधून बचावकार्य अधिक वेगाने करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या प्रशासनाचे प्रमुख लक्ष्य ढिगाऱ्याखाली अडकलेल्या भाविकांना सुरक्षित बाहेर काढणे हे असून संपूर्ण जिल्हा प्रशासन यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे.
