पक्ष फुटला, नेते फुटले, आदित्य ठाकरे यांची सगळी आशा आता सुप्रीम कोर्टाकडे…
गेलेले ते ४० लोक आता एकटे पडले आहेत. जनता आमच्यासोबत आहेत. त्यामुळेच त्यांना धास्ती वाट आहे. मुख्यमंत्र्यांना चलेंज दिलं आहे की त्यांनी वरळीतून लढावं. त्यांची हिंमत नसेल तर मी ठाण्यातून लढेन असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलंय.
![पक्ष फुटला, नेते फुटले, आदित्य ठाकरे यांची सगळी आशा आता सुप्रीम कोर्टाकडे... पक्ष फुटला, नेते फुटले, आदित्य ठाकरे यांची सगळी आशा आता सुप्रीम कोर्टाकडे...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/09/Your-paragraph-text-2023-09-21T174645.121.jpg?w=1280)
सिंधुदुर्ग : 20 सप्टेंबर 2023 | युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे सिंधूदुर्गच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आदित्य यांनी खासदार विनायक राऊत यांच्या घरी भेट दिली. आरती ओवाळून आदित्य ठाकरे यांचे विनायक राऊत यांच्या घरी स्वागत करण्यात आले. बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी भजनात मृदुंग, टाळ वाजवून भजनाला साथ दिली. आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यावर शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी टीका केली. त्यावर पलटवार करताना आदित्य ठाकरे यांनी ‘मी तर महाराष्ट्रातल्या घरातच चाललो आहे. त्यांच्यासारखे गुजरात आणि दिल्लीच्या घरात तर चाललो नाही ना?’ असा टोला लगावला.
कोकण पावसाळ्यात सुंदर असतं. पण, कोकणावर यांचा इतका राग का? असा सवाल त्यांनी केंद्र आणि राज्यसरकारला केला. रिफायनरी सारखे प्रकल्प आणायचे. चांगले रस्ते होऊ द्यायचे नाही. विमानतळ सुरळीत व्हायला द्यायचं नाही. हे असे का? सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर असुविधा आहेत. अजून तिथे नाईट लँण्डिंग झाले नाही. आणखी किती दिवस असे चालणार असा सवाल त्यांनी केला. आम्ही सरकारमध्ये होतो तेव्हा धक्का देऊन चिपी विमानतळ पूर्ण केला. आमचे सरकार गेल्यानंतर ते काम तसेच राहिले अशी टीका आदित्य यांनी केली.
वन नेशन वन इलेक्शन हे २०३० साला नंतरच होईल असे वाटतं. निवडणुका लागणार आहेत का? निवडणुका घ्यायला त्यांची हिंमत नाही. गेले दीड वर्षे राज्यात घटनाबाह्य सरकार बसले आहे. देशात लोकशाही राहिली आहे का? गद्दार सरकार सत्तेत बसले आहे. सगळी आशा आता सुप्रीम कोर्टाकडे आहे, असे ते म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष यांनी वेळेत कार्यक्रम पूर्ण करायला हवा होता. कोर्टाने निर्णय देऊनही तीन चार महिने त्यांची टाळाटाळ सुरु आहे. वेळ घेतला जात आहे. आपण लोकशाही साजरी करतो. पण, लोकशाही राहिली आहे का? हुकुमशाही सुरु आहे. हा देश जनतेचा देश आहे. जे जनतेला हवे आहे तेच होईल. कुणी कुणावर काही लादू शकणार नाही, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.
केंद्र सरकारने आणलेलं महिला आरक्षण हा सगळा जुमला आहे. आम्ही त्याला विरोध करत नाही. त्याला सपोर्ट करतो. पण, हे आरक्षण कधी लागू होणार? इकडे राज्य मंत्रीमंडळातील एक मंत्री महिलांना शिवीगाळ करतात. आजही ते मंत्री मंडळात आहेत. एक गद्दार आमदार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गणपतीच्या काळात फायरिंग करतात. वारकरी यांच्यावर लाठीचार्ज, मराठा तरुणांवर लाठीचार्ज, बारसूमध्ये महिलांवर लाठ्चार्ज झाला. हे घटनाबाह्य सरकार किती दिवस चालणार आहे? गद्दार आणि गँगस्टर यांचे हे सरकार आहे अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.